हिंगोली - निसर्ग बदलामुळे शेती करणे फारच जिकरीचे होऊन बसले आहे. अधूनमधून कधी अति पर्जन्यमान तर कधी कमी पर्जन्यमान होत असल्याने, पारंपरिक घेतलेल्या पिकाचे अतोनात नुकसान होत आहे. वातावरण बदलामुळे शेतीतून भांडवली खर्च देखील निघत नसल्याची सद्यस्थितीत परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे डोक्यावर असलेले कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हे फेडायच्या चिंतेने अनेक शेतकरी आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र जर डोकं लावून शेती केली तर आत्महत्या करण्याची अजिबात वेळ येणार नसल्याचे भांडेगाव येथील शेतकऱ्यांने खचून गेलेल्या शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
बळीराम जगताप असं या शेतकऱ्याचं नाव आहे. बळीराम यांनी गेल्या पाच ते सहा वर्षापासून पारंपरिक पिकाला बगल दिली आहे. बुलडाणा जिल्ह्यात कांद्याचे बियाणे घेऊन जगताप गेले होते. त्या ठिकाणी त्यांनी एका महिला शेतकऱ्याकडे भेट देऊन शेतीची पाहणी केली. तर कमी वेळात कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे, पीक त्या शेतीमध्ये आढळून आले. तेव्हापासून त्यांनी आगळी वेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला आणि पारंपरिक पिकाला साफ बगल दिली. त्यांनी शेतामध्ये भाजीपाला वर्गीय पिके घेण्यास सुरवात केली. यामध्ये सर्वप्रथम सिमला मिरचीची शेडमध्ये लागवड करून तिच्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळविले. विशेष म्हणजे केवळ वीस गुंठ्यातही शिमला मिरचीची लागवड केलेली आहे. या मिरचीला जिल्ह्यातच नव्हे तर परजिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मागणी असल्याचे जगताप सांगतात.
याला जोड म्हणून कृषी विभागाकडून त्यांना शेडनेट मिळालेल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या उद्योगाला चांगलीच चालना मिळाली असून सिमला मिरचीचे उत्पन्न दुपटीने वाढले आहे. आता पावसाळी मिरचीची लागवड केली आहे. कोबीची देखील लागवड केलेली आहे. तर काही प्रमाणात पावसाळी मका पेरली असून, त्याला देखील बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. शिवाय गुरांच्याही चाऱ्याचा प्रश्न सुटतो. पारंपरिक पिके घेतली असती, तर त्यामध्ये खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी परिस्थिती निर्माण झाली असती. मात्र या भाजीपाला वर्गीय पिकामुळे परिस्थिती सुधारली असून इतरही शेतकऱ्यांना मी हेच आवाहन करतो असे ते म्हणाले. खरोखरच आपण शेती जर डोक्याने केली, तर आपल्याला अजिबात चिंता करायची गरज पडणार नाही. एवढेच काय उत्पन्न चांगले मिळून आपल्या डोक्यावरील कर्ज देखील कमी होऊन आपण आपले जीवन सुखी अन समाधानाने जगू शकतो असेही ते म्हणाले.
वर्षभरात पाच ते सात लाख रुपये उत्पन्न होते. यातून दोन ते तीन लाख रुपये निव्वळ नफा, त्यामुळे शेतकऱ्यांनी बिनधास्तपणे पारंपरिक पिकाला बगल देऊन भाजीपाला वर्गीय पिकाकडे वळावे एवढेच आवाहन करतो असे बळीराम जगताप यांनी शेतकर्यांना आवाहन केले आहे.