हिंगोली - सांगली आणि कोल्हापूर येथील पूर परिस्थितीने संपूर्ण महराष्ट्र हादरून गेलाय. पूरामध्ये अनेक घरे उध्वस्त होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आलेत. तर अनेक जण पुरत बुडल्यामुले हळहळ व्यक्त केली जात आहे. बेघर लोकांना आधार देण्यासाठी अनेक जण सरसावले आहेत. मदतीचा ओघ सुरूच असून, आता हिंगोली नगरपालिका देखील मदतीसाठी सरसावली आहे. नगरपालिकेच्या वतीने शहरातील मुख्य मार्गावरून पूरग्रस्त मदत संकलन फेरी काढली. या फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद ही मिळाला. तर नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचे वेतन पूरग्रस्तांसाठी दिले आहे.
महाराष्ट्रात मुंबई, पुणे , कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोली या भागात अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झालीय. मागील 7 ते 8 दिवसापासून या भागातील प्रत्येक घरात पाणी शिरल्याने अनेकांना आप-आपली घरे सोडून इतरत्र, राहण्याची वेळ आलेली आहे. एवढेच नव्हे तर अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानातही मोठया प्रमाणात पाणी शिरल्याने, अतोनात नुकसान झाले आहे. जवळपास व्यापाऱ्यांच्या साहित्याचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान होऊन अनेक जण रस्त्यावर आले आहेत.
त्यामुळे पूरग्रस्त लोकांना खाण्यापिण्याचे साहित्य जमविणे दुरापास्त झाले आहे. पुरामध्ये अडकलेले नागरिक खाण्यापिण्यासाठी धावा करत आहेत. तर त्या ठिकाणची दैना पाहून सर्वांचीच मने हेलावून जात आहेत. पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी म्हणून हिंगोली नगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. नगरपालिकेतील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपले 1 दिवसाचे वेतन धनादेशाद्वारे जमा केले आहे. हिंगोली शहरातील मुख्य मार्गावरून पूरग्रस्त मदत संकलन फेरीही काढली. त्याला नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत धान्य, दैनंदिन साहित्य, ब्लांकेट्स, रेनकोट आदी स्वरूपात मदत दिली आहे. एवढेच नव्हे तर हिंगोलीकर कसलाही विचार न करता आपापल्या परीने पाहिजे ती मदत पूरग्रस्तांसाठी आर्थिक किंवा साहित्याच्या स्वरूपात कर आहेत.
मदत फेरीमध्ये अध्यक्ष बाबाराव बांगर, उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुपारी उशिरापर्यंत मदतफेरी शहरातील विविध मार्गाने सुरूच होती.