गोंदिया - राज्य सरकारच्या ५ वर्षातील कामाचा हिशोब जनतेपुढे ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी थेट संवाद साधणार आहेत. या यात्रेनिमित्त मुख्यमंत्री ३ ऑगस्टला गोंदिया येथे मुक्कामी असणार आहेत. तर ४ ऑगस्टला गोंदियातील गोरेगाव, सडक-अर्जुनी व अर्जुनी मोरगाव येथे त्यांची सभा होणार आहे.
गोंदिया व अर्जुनी मोरगाव येथे आयोजित सभेला मुख्यमंत्री संबोधित करणार आहेत, अशी माहिती भाजप जिल्हा अध्यक्ष हेमंत पटले यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारच्या मागील ५ वर्षाचा हिशोब देण्यासाठी ३ ऑगस्टला सायंकाळी ५ वाजता महाजनादेश यात्रा तुमसर मार्गे तिरोडा येथे दाखल होणार आहे. तिरोडा येथे यात्रेच्या स्वागतानंतर सायंकाळी ६ वाजता गोंदिया येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. इंदिरा गांधी स्टेडियममध्ये ही भव्य जाहीर सभा होणार आहे. या दिवशी मुख्यमंत्र्यांचा गोंदिया येथे मुक्काम असणार आहे. तर ४ ऑगस्टला सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यानंतर सकाळी साडेदहा वाजता गोरेगाव येथे यात्रेचे आगमन होणार आहे. याठिकाणी त्यांच्या स्वागतानंतर साडे अकरा वाजता सडक अर्जुनी आणि १ वाजता अर्जुनी मोर येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे.
गोंदियातील कार्यक्रम आटोपल्यानंतर महाजनादेश यात्रा गडचिरोली-चंद्रपूर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे. यात्रेची तयारी जिल्हास्तरावर सुरू असून यात्रेमध्ये फडणवीस सरकारच्या गेल्या ५ वर्षातील कामगिरीचे दर्शन घडविणारा एलईडी रथ यात्रेबरोबर असणार आहे. तसेच या यात्रेचा समारोप नाशिक येथे ३१ ऑगस्टला होणार आहे.