चंद्रपूर : विदर्भ ( Vidarbha activists ) हा पूर्वी मध्य प्रदेश प्रांतात येत होता. मात्र नंतर राज्यांची भाषवार संरचना झाली. येथील लोक मराठी भाषिक असल्याने हा भाग महाराष्ट्राला जोडण्यात आला, ज्याला सिपी अँड बेरार करार म्हणून ओळखले जाते. या करारानुसार विदर्भाचा अनुशेष भरून काढून येथील लोकांना समान संधी देण्याचे नमूद आहे. मात्र 50 वर्षे उलटून देखील विदर्भ हा अजूनही मागासच आहे. त्यामुळे या विरोधात विदर्भवाद्यांमध्ये कमालीचा रोष आहे. वेगळ्या विदर्भाची मागणी ( Vidarbha activists protested at MP Balu Dhanorkar residence ) फार जुनी आहे. मात्र अजूनही वेगळा विदर्भ झालेला नाही.
लोकप्रतिनिधिंविरोधात आंदोलन - भाजपच्या नेत्यांनी वेगळ्या विदर्भाची मोहीम चालविली. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अग्रस्थानी होते. सत्तेत आलो तर वेगळा विदर्भ करणार असे काही नेत्यांनी लिखितमध्ये दिले होते. मात्र केंद्रात आणि राज्यात सरकार आले असताना या नेत्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले. वेगळा विदर्भ व्हावा यासाठी विदर्भ राज्य संघर्ष समिती आक्रमक आहे. विदर्भवादी नेते माजी आमदार ऍड. वामनराव चटप यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन करण्यात आले. या माध्यमातून 'वेगळा विदर्भ द्या नाही तर खुर्ची खाली करा' या घोषणेच्या आधारावर लोकप्रतिनिधिंविरोधात आज आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांची भेट - काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानी पायदळी जाऊन हे आंदोलन होणार होते. वेगळा विदर्भ करा अन्यथा खुर्ची खाली करा ह्या घोषणा देत विदर्भवादी खासदार बाळू धानोरकर यांच्या बंगल्यावर पोचले. निवासस्थानी आंदोलन आले की अनेक लोकप्रतिनिधी यावेळी पळवाट काढतात. मात्र धानोरकर यांना ही बाब माहिती झाली असता त्यांनी पळ न काढता त्यांनी थेट आंदोलनकर्त्यांची भेट घेत त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
लोकसभेत आमचा आवाज दाबला जातो- तसेच सन्मानाने या सर्व आंदोलनकर्त्यांना आपल्या कार्यालयात आमंत्रित केले मात्र, नेते चटप यांनी नम्रपणे त्यास नकार दिला. यावेळी खासदार धानोरकर यांनी सर्व आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत आपली भूमिका मांडली. वेगळ्या विदर्भाला काँग्रेसने कधीही विरोध केला नाही, आपण देखील वेगळ्या विदर्भाच्या बाजूने आहोत. मात्र लोकसभेत आमचा आवाज दाबला जातो, आम्हाला बोलू दिले जात नाही. याउलट जे भाजपचे नेते वेगळया विदर्भाचे आश्वासन देऊन संसदेत गेले. ते मात्र यावर एक चकार शब्द बोलायला तयार नाहीत. मात्र आपण वेगळ्या विदर्भाच्या बाजूने असून यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन दिले. यामुळे सर्वांचेच समाधान झाले. खासदार धानोरकर यांनी दाखवलेली गांमधीगीरी, आदरातिथ्य आणि सामंजस्याने आंदोलनकर्ते देखील भारावून गेले.