चंद्रपूर - शहरात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लाक्षणीय असून कोरोनाच्या पार्श्वभुमीवर आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने भाडेकरूंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही. अशा बिकट परिस्थितीमध्ये घरभाडे किमान तीन महिने पुढे ढकलण्याचे तसेच कोणत्याही भाडेकरूंना घरामधून न काढण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी गृहनिर्माण विभागाच्या सूचनेनुसार दिले आहेत.
सध्या जगभरात पसरलेल्या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर संपुर्ण देशात 23 मार्चपासून टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊन 3 मेपर्यंत कायम राहणार आहे. यामुळे सर्व आर्थिक व्यवहार बंद आहेत. याचा सर्वसामान्य जनतेच्या रोजगारावरही परिणाम झालेला असुन अनेकांचे उदरनिर्वाहाचे साधन बंद आहे. यामुळे सर्वसामान्य जनतेला आर्थिक अडचणींनाही तोंड द्यावे लागत आहे.
राज्यात भाड्याच्या घरांमध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण लाक्षणीय असून आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे भाडेकरूंना ते राहत असलेल्या घरांचे भाडे नियमितरित्या भरणे शक्य होत नाही व भाडे थकत आहे. त्यामुळे घरभाडे वसुली किमान 3 महिने पुढे ढकलावी व या कालावधीत वेळेवर भाडे रक्कम न मिळाल्यास कोणत्याही भाडेकरूंना घरामधून निष्कासित करण्यात येऊ नये, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. खेमणार यांच्याद्वारे जिल्हातील सर्व घरमालकांना देण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील भाडेकरूंना दिलासा दिला आहे.
हेही वाचा - चंद्रपूर महापालिका : मास्क न वापरता विनाकारण फिरणाऱ्या 386 नागरिकांवर कारवाई, 78 हजारांचा दंड वसूल