चंद्रपूर - स्वतः सिकलसेल आणि किडनीच्या आजाराने बेजार, घरी पक्षघाताच्या आजाराने अंथरुणावर खिळलेली आई आणि विधवा बहीण व तिची मुलगी. या सर्वांचे पालनपोषण करण्याची जबाबदारी एकट्या लोमेशवर होती. पानटपरी चालवून कशीबशी गुजराण व्हायची. मात्र, मार्च महिन्याच्या शेवटी लॉकडाऊन घोषित झाला. थोडेबहुत उत्पन्न तेही ठप्प झाले. यामुळे नैराश्यात गेलेल्या लोमेश गेडाम या 44 वर्षीय व्यक्तीने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना आज घडली.
लोमेश हा मूल शहरातील वार्ड क्रमांक 1 मधील रहिवासी होता. त्याचा मूल येथील बस स्थानकासमोर पानटपरीचा व्यवसाय होता. लोमेशला किडनी आणि सिकलसेलचा आजार होता. त्यामुळे वारंवार दवाखान्यात जावे लागत होते. आईला देखील पक्षघाताच्या आजाराने अंथरुणावर पडून होती. बहीण विधवा झाल्याने तीही घरीच असायची, सोबत तिची मुलगी. अशा सर्वांची जबाबदारी एकट्या लोमेशवर होती. कसाबसा संसाराचा गाडा सुरू होता. मात्र, कोरोनामुळे झालेल्या लॉकडाउनमूळे लोमेशचा रोजगार हिरावला गेला. सर्व दुकानांना उघडण्याची परवानगी प्रशासनाने दिली. मात्र, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर ही बंदी कायम ठेवली. जवळपास दोन महिन्यांपासून टपरी बंद होती. त्यामुळे पैसा आणायचा कुठून हा प्रश्न लोमेशसमोर होता.
घरच्यांचा सांभाळ करणे त्याला अशक्य झाल्याने लोमेशने आपल्या घराजवळील शेतात असलेल्या विहिरीत उडी घेवून जीवनयात्रा संपविली. त्याच्या घरी आणि विहिरीजवळ अशा दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या. त्यात आजारांनी त्रस्त होवून आत्महत्या करीत असल्याचे कारण सांगितले आहे. लोमेशच्या आत्महत्येमुळे, त्याच्यावर अवलंबलून असलेले कुटूंब उघड्यावर पडले असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.