चंद्रपूर - सत्तास्थापन करण्यासाठी होणारी चर्चा ही भावनेच्या आधारावर होत नसून ती मेरीटच्या आधारावर होते, असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. राज्यात सत्तास्थापन करण्यासाठी भाजप-सेनेत तणाव निर्माण झाला आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी हे सूचक वक्तव्य केले आहे. त्यामुळे कमी जागा मिळाल्याच्या आधारावर भाजप सेनेला जास्त महत्त्व देण्यास इच्छूक नाही, असे चित्र दिसून येत आहे.
हेही वाचा - राऊतांनी घेतली पवारांची भेट ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार, असे सांगितले होते. त्यावर मुख्यमंत्री कोणाचा हे पत्रकार परिषद ठरवत नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला आहे. जनतेची स्वप्न पूर्ण व्हावीत ही जनतेची आशा आहे. म्हणूनच जनतेने विश्वासाने महायुतीला मत देऊन आशिर्वाद दिला, असेही त्यांनी सांगितले. तसेच लवकरच भाजप-शिवसेनेचे नेते सत्तास्थापनेबाबत चर्चा करणार आहेत. त्यामध्ये कोणते खाते कुणाला द्यावे? याबाबत चर्चा होईल, असेही त्यांनी सांगितले. मात्र, कमी जागा मिळाल्याच्या आधारावर भाजप सेनेला जास्त महत्त्व देण्यास इच्छूक नाही, असे चित्र दिसून येत आहे.