चंद्रपूर - सध्या राज्यात तिसऱ्या लाटेचे सावट आहे. ओमायक्रॉनने राज्यात चिंतेचे वातावरण निर्माण केले आहे. त्यामुळे, राज्य शासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. असे असताना चंद्रपूर जिल्ह्यात मात्र अजूनही याचे गांभीर्य नागरिकांना लक्षात आलेले दिसून येत नाही. गर्दीच्या ठिकाणी नागरिक विनामास्क फिरत आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसत नाही. प्रशासन देखील याबाबत गाफील असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Vijay Wadettiwar on OBC Reservation : ओबीसी आरक्षण मिळू नये, याकरिता राजकीय षडयंत्र - विजय वडेट्टीवार
मास्क लावणे बंधनकारक असून न लावणाऱ्यांना दंड ठोठावण्याचे निर्देश असताना देखील यावर कुठलीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे, चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत चंद्रपूर जिल्हा हा सर्वात शेवटी प्रभावित झाला होता. असे असताना देखील दुसऱ्या लाटेत मात्र जिल्ह्याची संपूर्ण आरोग्य व्यवस्था कोलमडली असल्याचे चित्र सर्वत्र दिसून आले. रुग्णांना भरती करण्यासाठी रुग्णालयांत जागा उरली नव्हती. अनेकांचा उपचाराविनाच उघड्यावर मृत्यू झाला होता. 88 हजार 862 लोकांना कोरोनाची लागण झाली होती. तर, 1 हजार 543 लोकांना आपला जीव गमवावा लागला.
सध्या चंद्रपूर जिल्ह्यात 18 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. कोरोनाच्या नियमांचे कडकपणे पालन केले गेले नाही तर, स्थिती वाईट होण्यास वेळ लागणार नाही. नागरिक आणि प्रशासन या धोक्याबाबत अजूनही गाफील असल्याचेच चित्र दिसून येत आहे. अनेक लोक मास्क न लावताच शहरात मुक्तसंचार करताना दिसत आहे. प्रशासनाकडून यावर कारवाई करतानाचे दिसून येत नाही.
वाहतूक कर्मचारी, पोलीस कर्मचारीच विनामास्क तैनात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जर कारवाई करणारे प्रशासनच ही बाब गांभीर्याने घेत नसेल तर, सामान्य नागरिक कोरोनाच्या नियमांचे पालन कसे करणार? ही बाब देखील महत्वाची आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण राज्यात आढळल्यानंतर राज्य शासन अलर्ट मोडमध्ये आहे. तसे निर्देश देखील राज्यशासनाने जिल्हापातळीवर दिले आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा - Chandrapur Accident : अपघातात मायलेकीचा घटनास्थळी मृत्यू ,वडिलांने सोडले प्राण