चंद्रपूर- जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्याला वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा मोठा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून नागरिकांना यातून बाहेर काढण्यासाठी बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. मदतकार्यात हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जात आहे. 1994 सालानंतरचा हा सर्वात मोठा पूर असल्याचे बोलले जात आहे.
ब्रम्हपुरी तालुक्याला लागून वैनगंगा नदी वाहते. या नदीवर बांधण्यात आलेला गोसी खुर्द धरण प्रकल्प देखील काही अंतरावर आहे. धरण प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. याचा फटका ब्रम्हपुरी तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील वैनगंगा नदीकाठावर वसलेल्या पिंपळगाव, खरकाडा, निलज, लाडज, बेलगाव, कोलारी या गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. या सर्व गावांचा संपर्क तुटला असून या गावात पाणी शिरले आहे. गांगलवाडी-आवळगाव, देऊळगाव-कोलारी, पारडगाव-ब्रम्हपुरी या मार्गावरून वाहणाऱ्या नाल्याला पूर आल्याने तो मार्ग बंद झालेला आहे.
हेही वाचा-नागपूर जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम, एसडीआरएफने १४ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले
ब्रम्हपुरी-आरमोरी मार्गावरील बेटाळा फाट्यालगत असलेल्या तीन घरांमध्ये व एका महाविद्यालयात १५ नागरिक अडकून पडले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पूर नियंत्रक पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. बेलगाव आणि लाडज येथील बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. बोटीच्या साहाय्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. काही ठिकाणी मदतकार्यासाठी हेलिकॉप्टरची देखील मदत घेतली जात आहे. राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांचे हे विधानसभा क्षेत्र आहे. त्यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली आहे.