बुलडाणा - राज्यात कोरोना फैलाव थांबायचे नाव घेत नाही. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा या कोरोनाच्या संकटातच बुलढाणा जिल्ह्यावर मात्र पाणीटंचाईचे संकट कोसळले आहे आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील आदीवासी बहुल क्षेत्रातील संग्रामपुरमध्ये पाणीटंचाईचे भीषण वास्तव समोर आले आहे. शहराला 12 ते 15 दिवसानंतर नगरपंचायतीकडून पाणीपुरवठा पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना वणवण करावी लागत आहे.
विशेष म्हणजे 2 ते 3 किलोमीटर अंतर गाठून लहान-लहान मुले, महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. यामुळेच नागरिक कोरोनाच्या काळात त्रस्त झाले आहेत.
संग्रामपूर शहराला पाणी 140 गाव नळ योजने अंतर्गत पाणी पुरवठा करण्यात येत आहे. संग्रामपूरची लोकसंख्या 10 हजार आहे. शहराला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन वेळोवेळी नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे 12 ते 15 दिवसांनंतर नळाला पाणी पुरवठा केला जातो. दरम्यान, या प्रकरणाची नगरपंचायतीने तत्काळ दखल घेत पाणीपुरवठ्याची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.