बुलडाणा - विधानसभा निवडणुकीतील बंडोबांना थंड करताना सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांच्या तोंडाला फेस आला आहे. त्यांना भविष्यातील राजकीय ‘गणिते’ देऊन शांत करण्यात अनेक नेत्यांना बऱ्यापैकी यश आले. मात्र, काही बंडोबा नेत्यांची विनंती झुगारून निवडणुकीच्या आखाड्यात शड्डू ठोकून उभे आहेत. युती धर्म पाळून शेतकरी कामगार पक्षाच्या घाटाखालील उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत.
हे वाचलं का? - पुणे जिल्ह्यात 'बंडोबा' होणार का 'थंडोबा'..?
विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या काही बंडोबांना थंडोबा व्हावे लागले. यामध्ये जळगाव जामोद विधानसभा मतदार संघातून काँग्रेस पक्षाने उमेदवारी नाकारलेले सहकार नेते प्रसन्नजीत पाटील यांनी आपल्या लोकप्रियतेच्या भरवशावर अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली होती. ३ वर्षांपूर्वी पाटील यांची काँग्रेस पक्षात घर वापसी झाली झाली होती. त्यावेळी त्यांना २०१९ मध्ये जळगाव जामोद मतदार संघातून उमेदवारी देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. तसेच बंडाचे निशाण रोवले होते. वेगळ्या बैठक घेऊन त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे पाटील यांनी आपला अर्ज माघारी घेतला. यावेळी त्यांच्या चाहत्या वर्गाने काँग्रेस पक्षविरोधात रोष व्यक्त केला. पाटील यांनी उमेदवारी कोणत्या अटीवर मागे घेतली? हे अजून स्पष्ट झालेले नाही.
हे वाचलं का? - उद्धव ठाकरेंची गर्जना, शिवसेनेचा 'मुख्यमंत्री' करणार म्हणजे करणारच!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रशांत डिक्कर यांनी देखील आपली उमेदवारी मागे घेतली. वंचित आघाडीकडून अर्ज भरणारे शरद बनकर यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. खामगाव विधानसभा मतदार संघात नामांकन मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वंचितकडून दुसऱ्या क्रमांकाचे अर्ज भरणारे ज्येष्ठ नेते गणेश चौकसे, शेकापचे कैलास फाटे यांनी आपले अर्ज मागे घेतले. मलकापूर मतदारसंघात अपक्ष म्हणून अर्ज भरणारे संजय दाभाडे आणि अजय भिडे यांनी आपले अर्ज मागे घेतले.
सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी २ दिवसांपासून बंडखोरांची मनधरणी करण्याची गती वाढविली होती. त्यांच्या वारंवार बैठका घेतल्या. शब्द मानणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना थंड करण्याचा प्रयत्न झाला. पक्षात ऐनवेळी आलेल्यांना, नवख्यांना तुम्ही उमेदवारी दिली आणि आम्ही वर्षानुवर्षे पक्षात प्रामाणिकपणे व निष्ठेने काम करूनही नेमकी उमेदवारीच्या वेळी आमची उपेक्षा का?, लाभाच्या वेळी तुम्ही नात्यातील, मर्जीतील लोक पुढे करता आणि आम्ही आयुष्यभर झेंडे पकडून सतरंज्याच उचलायच्या का? असा या बंडखोरांचा सवाल होता. त्यांच्या या प्रश्नावर नेतेही अनुत्तर झाले. मात्र, मध्यम मार्ग काढून या बंडखोरांना थंड करण्यात नेत्यांनी बऱ्यापैकी यश मिळविले.