खामगाव-बुलडाणा: भारत जोडो यात्रेदरम्यान (Congress Bharat Jodo) राहुल गांधी यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या नावाने श्रद्धांजली वाहताना त्यांच्याचं कार्यकर्त्यांनी फटाके फोडले, आणि हे काम भाजपने केले असा आरोप राहुल गांधींनी केला. हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असुन, काँग्रेसने फटाके फोडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची (Suicidal farmers) थट्टा केली अशी प्रतिक्रिया भाजप जिल्हाध्यक्ष तथा आ.आकाश फुंडकर यांनी दिली आहे.
भारत जोडो यात्रेच्या नावाने राहुल गांधी देशात फिरून समाजात फूट पाडण्याचे काम करीत आहेत. नको ते वक्तव्य करून ते महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करीत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर जाणिपूर्वक बेताल वक्तव्य करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला गेला. आज परत एकदा काँग्रेस पक्ष व राहुल गांधी यांनी प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न केला. कार्यक्रमात आत्महत्याग्रस्तांना श्रद्धांजली देण्याचे नाटक केले. असे फुंडकर म्हणाले.
काँग्रेसचा स्टंट- महाराष्ट्रातील जनता व शेतकरी सुज्ञ आहेत. त्यांना मूर्ख बनविण्याचा प्रकार काँग्रेस व राहुल गांधींनी करू नये. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती दिमाखात साजरी करायची आणि तुम्हीच सांगायचं, फटाके फोडायचे, आता हे फटाके जयंती निमित्ताने फोडले, की राहुल गांधींच्या स्वागतासाठी फोडले, की जाणिपूर्वक शेतकऱ्यांच्या श्रध्दांजलीची औपचारीकता पार पाडली आणि स्वत: फटाक्यांची आतिषबाजी करुन त्याचे खापर भाजपच्या माथी फोडण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रश्नांची उत्तरं काँग्रेसकडेच आहेत. असे फुंडकर म्हणाले.