परळी वैजनाथ(बीड) - महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना आज दुपारी घडली आहे. या घटनेने नागरिक संतप्त झाले असून, वारंवार सांगूनही करंट उतरणाऱ्या पोलची दुरुस्ती केली नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे. गौरी वैजनाथ घोटकर (वय ६ वर्षे) असे त्या चिमुरडीचे नाव आहे.
याबाबत प्राप्त माहिती अशी की, महावितरण कार्यालयाच्या अगदी पाठीमागील बाजूस असलेल्या हबीबपुरा भागातील रस्त्यावर असलेल्या विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसांपासून करंट उतरत होता. नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार यासंदर्भात कळवले. या भागातील नागरिक नेहमी या खांबापासून दूर राहत असत. मात्र, आज अतिशय दुर्दैवी घटना घडली असून या भागातील एक छोटी सहा वर्षीय मुलगी या खांबाच्या संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
या दुर्दैवी घटनेनंतर या भागातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून, महावितरणच्या गलथान कारभाराने या मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची चीड नागरिक व्यक्त करत आहेत.