बीड- पाली येथील घाटात रविवारी ट्रक-कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कारमधील ४ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
कारमधील तरुण उस्मानाबादकडून बीडकडे नातेवाईकाच्या लग्नासाठी जात होते. मात्र, यावेळी पालीच्याघाटात एका ट्रकने कारला समोरासमोर धडक दिली. यामध्ये कारचा चकनाचूर झाला. या अपघातात अक्षय रामलिंग गाडवे (रा. धानोरा, ता. अंबाजोगाई), सौरभ अरुण लोहारे (रा. लातूर), तेजस सुभाष गुजर (रा. अंबाजोगाई) मंगेश मल्लिकार्जुन कुंकुकरी (बार्शी जि. सोलापूर) या 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर शुभम दत्तात्रय उंब्रे (रा. वानेवाडी ता. उस्मानाबाद) याला उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयातून औरंगाबाद येथे दाखलकेले आहे. कार (क्र. एम. एच. ०२-२१११) मध्ये एकूण ५ जण प्रवास करत होते. सर्व मयत आणि जखमी २५ ते ३० वयोगटातील आहेत. मृत तेजसचा भाऊ कुंभेश याचे कपिलधार येथे आज दुपारी लग्न होते. तर मृत सौरभ आणि मंगेश हे एकमेकांचे मेहुणे होते, असे समजते.
या अपघातात तेजस गुजर आणि सौरभ लोहारे हे दोघे जागेवरच ठार झाले तर अक्षय गाढवे आणि मंगेश कुमकरी या दोघांचा उपचारादरम्यान बीड जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या नातेवाईकांसोबत पोलीस संपर्क साधत आहेत.