आष्टी(बीड) - तालुक्यातील कडा गावापासून जवळच असलेल्या शेरी (खुर्द) येथे दादासाहेब सुरेश ढोबळे या युवा शेतकऱ्याची तीन एकर शेती आहे. या शेतीला पाणी देण्यासाठी दादासाहेब ढोबळे याला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून पंप मिळाला आहे. वीज उपलब्ध नसणे किंवा विजेचा लपंडाव यासारख्या अडचणीतून दादाची सुटका झाली आहे. यामुळे कांदा, ऊस, गहू, घास या पिकांबरोबर त्याची लिंबोणीची बाग पण बहरणार आहे.
दरम्यान, ही योजना आणि त्याच्या लाभाचे निकष याबद्दल माहिती देताना लाभार्थ्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सौर कृषी पंपसाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी लागते. आपल्या शेतीला शाश्वत पाणी पुरवठा करणारी विहीर, बोअर असावा. मात्र, तिथे आधी विद्युत पुरवठा नसावा एवढीच या योजनेची महत्वाची अट आहे.
दादा ढोबळे आत्मनिर्भर -
दादा ढोबळे याने त्यासाठी अर्ज केल्यावर नियम, अटींची पूर्तता झाल्यावर त्याला 16 हजार 560 रुपये भरावे लागले. त्यानंतर त्याला 1 लाख 54 हजार रुपयांचे सौर कृषी पंप व साहित्य मिळले. यात सौर पॅनल, त्याचे स्ट्रक्चर, मोटार, केबल आणि घरी वापरण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करून चालवले जाणारे दिवे इत्यादी साहित्य मिळाले आहे. ज्या कंपनीकडून हे साहित्य पोहोच झाले त्यांनीच त्याची उभारणी करून दिली आहे. त्याने शेतात बोअर घेतलेला असून जेव्हा दिवसभर सौर विद्युत पुरवठा सुरू असतो तेव्हा बोअरवरची ही मोटार चालू करून शेतीला पाणी देता येते. या सौर कृषी पंपामुळे शेतीला दिवसा पाणी देणे शक्य झाले आहे. आता वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि वीज बिल या दोन्हीपासून मुक्तता मिळाल्याचे दादासाहेब ढोबळे याने 'ई टीव्ही भारत'सोबत बोलताना सांगितले.