बीड- शासन नियमाप्रमाणे जमीन न दिल्यास जीवाचे बरे वाईट करून घेण्याचा पवित्रा घेतलेल्या शहीद जवानाच्या पत्नी भाग्यश्री तुकाराम राख यांनी स्वातंत्र्यदिनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. याबाबत 'ईटीव्ही भारत' ने शुक्रवारी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत अखेर शनिवारी पालकमंत्री धनंजय मुंडे शहीद जवान पत्नी भाग्यश्री राख यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
१५ ऑगस्टला मंत्री धनंजय मुंडे यांनी भाग्यश्री राख यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अखेर राख यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले असल्याचे लेखी जाहीर केले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, २०१० साली ऑपरेशन रक्षकमध्ये शहीद झालेल्या थेरला ता. पाटोदा येथील तुकाराम राख यांच्या शहीद पत्नी भाग्यश्री राख यांनी शासन नियमाप्रमाणे २ हेक्टर जमीन मिळण्यासाठी अर्ज केलेला आहे. त्यांच्या अर्जास अनेक दिवस उलटून देखील न्याय मिळत नसल्याची तक्रार करत भाग्यश्री यांनी १५ ऑगस्टला आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शहीद जवानाच्या पत्नी भाग्यश्री राख यांची कैफियत 'ईटीव्ही भारत' ने मांडली होती. याची दखल मंत्री धनंजय मुंडे यांनी घेतली आहे.
याबद्दलची माहिती मिळताच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी तात्काळ दूरध्वनीवरून संपर्क करून भाग्यश्री राख यांना 15 ऑगस्टला भेट घेऊन चर्चेद्वारे विषय मार्गी लावण्याबाबत आश्वासन दिले. तसेच शहीद पत्नी भाग्यश्री राख यांनी ना. मुंडे यांच्या आश्वासनानंतर आपण आंदोलन मागे घेत असल्याचे मंत्री मुंडे यांना कळवले असल्याचे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.