औरंगाबाद - चार महिन्यांपुर्वी पतीसोबत राहण्यासाठी गेलेल्या बहिणीला मेव्हण्याने मारहाण केल्याचे कळताच संतापलेल्या साल्यांसह साडूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत मेव्हण्याला जीव गमवावा लागला. याप्रकरणी छावणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.
ही मारहाणीची घटना २ ऑगस्टला दुपारी चारच्या सुमारास भीमनगर, भावसिंगपुरा भागात घडली होती. या मारहाणीत भास्कर उत्तम जाधव यांचा मृत्यू झाला आहे. तर विलास भिकाजी मोटे, संतोष भिकाजी मोटे, कैलास भिकाजी मोटे (सर्व रा. गारखेडा परिसर) आणि अशोक नाडे (रा. भीमनगर, भावसिंगपुरा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
गेल्या सहा महिन्यांपुर्वी मृत भास्कर जाधव यांचा पत्नीशी वाद झाला होता. या वादातून त्यांची पत्नी लता ही घर सोडून माहेरी गेली होती. ती बेपत्ता झाल्याची तक्रार भास्कर जाधव यांनी छावणी पोलीस ठाण्यात दिली होती. मात्र, गेल्या चार महिन्यांपुर्वी लता या पुन्हा सासरी राहण्यासाठी गेल्या. दरम्यान, २ ऑगस्टला भास्कर आणि लता यांच्यात वाद झाला. या वादातून भास्कर यांनी लता यांना मारहाण केली.
हेही वाचा - धक्कादायक: जालन्यात दारुसाठी मुलानेच केली आईची हत्या
प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भास्कर आणि लता हे दोघेही आपसातील मारहाणीत जखमी झाले होते. या मारहाणीबाबत लता यांनी तिन्ही भावांशी संपर्क साधत मारहाणीबाबत माहिती दिली. त्यामुळे संतापलेल्या मोटे भावंडांनी मेव्हणा अशोक नाडे याला सोबत घेत भास्कर जाधव यांचे घर गाठले. त्यानंतर मोटे आणि नाडे या चौघांनी भास्कर जाधव यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत भास्कर जाधव हे गंभीर जखमी झाले. त्यांना जाधव कुटुंबीयांनी घाटीत दाखल केले. या घटनेनंतर रमेश उत्तम जाधव (६०) यांनी छावणी पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली होती. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सुरुवातीला कैलास मोटे याला अटक केली.
पोलिसांसमक्ष आरोपी हजर -
भास्कर जाधव यांना मारहाण झाल्याची घटना घडल्यानंतर छावणी पोलीस मोटे आणि नाडे यांचा शोध घेत होते. त्यांच्या मदतीला एमआयएमचे पदाधिकारी अरुण बोर्डे धावून गेले. त्यांनी शुक्रवारी सकाळी विलास मोटे, संतोष मोटे आणि अशोक नाडे यांना छावणी पोलिसांसमोर हजर केले. मात्र, काही वेळातच घाटीत उपचार घेत असलेल्या भास्कर जाधव यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे चौघांविरुध्द आता खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.