औरंगाबाद - माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणाला रामराम ठोकला आहे. तर आपली राजकीय उत्तराधिकारी म्हणून पत्नी संजना जाधव यांचे नाव त्यांनी जाहीर केले आहे. लॉकडाऊनमध्ये अध्यात्मिक पुस्तक वाचून राजकारण सोडण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. हर्षवर्धन जाधव यांनी सोशल मीडियावर ही भूमिका जाहीर केली.
सध्या लॉकडाऊन आहे. या काळात अध्यात्मिक पुस्तक वाचन केले. त्यामुळे आपण जे काही करत आहोत त्यात काही राम राहिलेला नाही, हे मला कळले असल्याने आपण हा निर्णय घेतला असल्याचे हर्षवर्धन जाधव यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या मार्गदर्शनात माझी पत्नी संजना जाधव सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवतील आणि आगामी काळात संजना जाधव भाजपातर्फे कन्नड विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतील, असे संकेत हर्षवर्धन जाधव यांनी दिले.
हेही वाचा - साफसफाई करताना माळेगाव साखर कारखान्यातील सहा कामगार बेशुद्ध
सर्वांच्याच घरात वाद असतात. माझ्याही घरात झाले. मात्र, आता वाद नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. तर हर्षवर्धन जाधवांच्या राजकीय संन्यास कायम राहील की भूमिका बदलण्याची असलेल्या सवयीमुळे पुन्हा ते आपली भूमिका बदलणार, हे येणारा काळच सांगेल.
हर्षवर्धन जाधव यांचा प्रवास -
हर्षवर्धन जाधव 2009 मध्ये मनसे तर 2014 मध्ये शिवसेनेकडून कन्नड विधानसभा जिंकत आमदारकी भूषवली. अनेक वादग्रस्त मुद्यांवर चर्चेत राहिलेल्या जाधव यांनी 2019 साली स्वतःचा पक्ष काढत लोकसभा निवडणूक लढवली. त्याचा फटका शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना बसला. विधानसभा निवडणुकीत कन्नड विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार उद्यसिंग राजपूत यांनी त्यांचा पराभव केला. मनसे पक्षाने आपली नवी भूमिका जाहीर केल्यावर हर्षवर्धन जाधव यांनी राज ठाकरे यांची भेट घेत पुन्हा मनसेत प्रवेश केला. औरंगाबाद महानगरपालिका निवडणूक हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वात लढवली जाईल, असे संकेत मिळत असताना त्यांनी अचानक राजकारणातून संन्यास घेतला.