अमरावती - बनमेरू महाविद्यालयाच्या कारभारावर आक्षेप नोंदवत संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्याबर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये चौकशी समितीने प्राचार्य डॉ. बनमेरू यांच्यावर कठोर कारवाई व्हावी, असा अहवाल दिला होता. तरीही महाविद्यालयावर कारवाई न झाल्यामुळे बनमेरू महाविद्यालयाच्या प्राचार्यांना संत गाडगे बाबा विद्यापीठाचे अभय आहे का ? अशा चर्चांना उधाण आले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित बुलडाणा जिल्ह्यात लोणार येथे बनमेरू महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाविरोधात अनेक तक्रारी आल्यानंतर अमरावती विद्यापीठाने डॉ. एफ. सी. रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने बनमेरू महाविद्यालयातील सर्व कारभाराची चौकशी करून प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी, असा अहवाल ५ ऑक्टोबर रोजी विद्यापीठाला सादर केला होता. अहवाल सादर होऊन आता ७ महिने उलटूनही अमरावती विद्यापीठ बनमेरू यांच्यावितोधात कारवाई का करत नाही? असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. येत्या १५ दिवसांत विद्यापीठ प्रशासनाने प्राचार्य बनमेरू यांच्यावर करावाई केली नाही तर विद्यापीठासमोर उपोषण करण्याचा इशारा गायकवाड यांनी यावेळी दिला आहे.
बनमेरू महाविद्यालयामध्ये बनमेरू कुटुंबातील सदस्य वगळता इतर शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनवर प्रचंड अन्याय केला जातो. गत २ वर्षांत या महाविद्यालयातील २२ ते २३ प्राध्यापकांना कोणतेही कारण नसताना चक्क बडतर्फ करण्यात आले आहे. लोणारच्या बनमेरू महाविद्यालयातील या प्रकाराबाबत प्राध्यापक डॉ. प्रविण गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
प्राध्यापक डॉ. प्रवीण गायकवाड हे जानेवारी २०१६ मध्ये प्राध्यापकाची जाहिरात वाचून लोणारच्या बनमेरू महाविद्यलयात मुलाखतीसाठी आल्यानंतर त्यांची नियुक्ती झाली होती. या महाविद्यल्यात बनमेरू कुटुंबातील अनेक सदस्य नोकरीवर आहेत. ते महाविद्यालयात येत नाहीत, तरीही त्यांचा पूर्ण पगार काढण्यात येतो. इतरांना मात्र बायोमेट्रिक हजेरी लावल्यानंतरही महाविद्यालयात पोहोचताच संस्थेच्या अध्यक्षांना फोन लावून महाविद्यालयात आल्याची माहिती द्यावी लागते. या महाविद्यालयात सेट, नेट झालेल्यांची प्राचार्य आर्थिक फसवणूक करतात. माझ्यासह ५ प्रधायपकांना कारण न देता एप्रिल २०१७ मध्ये बडतर्फ करण्यात आले, असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.