अमरावती- कोरोनाची भीती कायम असताना सोमवारपासून अमरावती पुन्हा एकदा बहरली आहे. शहरातील सर्वच बाजारपेठा आजपासून सुरू झाल्या आहेत. सम आणि विषम पद्धतीने व्यापारी प्रतिष्ठाने उघडली असून अमरावतीकरही आता स्वतःची काळजी घेत घराबाहेर पडले आहेत.
सोमवारी सकाळी 9 वाजल्यापासून अमरावती शहरातील बाजारपेठ तब्बल तीन महिन्यानंतर उघडली. राजकमल चौक, जयस्तंभ चौक या शहरातील मुख्य चौकातील एक बाजूची व्यापारी प्रतिष्ठाने उघडली असून दुसऱ्या बाजुची दुकाने मंगळवारी उघडतील. याच नियमानुसार इतवरा बाजारही उघडणार आहे. सोमवारीच हा बाजार उघडणार होता. मात्र, येथील व्यापाऱ्यांचे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांवर आज महापालिकेचे अधिकारी त्यांच्याशी चर्चा करतील त्यानंतर मंगळवारपासून इतबारा बाजार सुरू होणार आहे.
शहरातील हॉटेल उघडण्यास मात्र परवानगी नाकारण्यात आली आहे. शहरातील बाजारपेठ सकाळी 9 वाजता उघडल्यावर सायंकाळी 5 वाजता बंद होणार आहे. कोरोना संटक कायम असले तरी योग्य ती खबरदारी घेऊन अमरावतीकर घराबाहेर पडत आहेत.
हेही वाचा- जम्मू-काश्मीर; शोपीयानमध्ये सुरक्षा दलाने केला 4 दहशतवाद्यांचा खात्मा