अमरावती - अमरावती शहरालगत असणाऱ्या वडाळी पोहरा जंगलातून जाणाऱ्या अमरावती - वर्धा मार्गावर रविवारी अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट जागीच ठार झाला. या मार्गावर गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी याबाबत वनविभागाला माहिती दिली.
हेही वाचा - Best out of Waste : अमरावतीतील चांदुर रेल्वे स्थानकाचे झाले बागेत रुपांतर
बिबट्याल वडाळीच्या जंगलात भडाग्नी
अमरावती - वर्धा मार्गावर वाघामाय मंदिरालगत रस्त्यावर बिबट असल्याचे दिसताच गस्तीवर असणारे पोलीस आधी घाबरले. मात्र, स्त्यावर पडून असणार्या बिबट्याची कुठलीही हालचाल नसल्यामुळे बिबट दगावल्याचे पोलिसांना लवकरच लक्षात आले. पोलिसांनी याबाबत वन अधिकाऱ्यांना माहिती दिली. वन कर्मचारी व पशुवैद्यकीय समुहाने घटनास्थळ गाठले. बिबट्याचा पंचनामा करून त्याला वडाळी येथील पशू संरक्षण कक्षात आणण्यात आले. अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट ठार झाल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. मुख्य वनसंरक्षक ज्योती बॅनर्जी आणि उपवनसंरक्षक चंद्रसेखरण बाला यांच्या मार्गदर्शनात बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनादरम्यान बिबट्याचे कमरेचे हाड मोडले होते आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने बिबट दगावल्याचा अहवाल पशुवैद्यकीय चमूने दिला. यानंतर वडाळी जंगलात भडाग्नी देऊन बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मानद वन्यजीव रक्षक डॉक्टर जयंत वडतकर, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त राजू खेरडे, वडाळी वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर आदी उपस्थित होते.
जंगलात वर्दळ वाढल्याने वन्य प्राणी असुरक्षित
अमरावती - वर्धा हा मार्ग पोहरा जंगलातून जातो. या जंगल परिसरात वाघामायचे जुने मंदिर आहे. या मंदिरात भाविकांची गर्दी वाढत आहे. जंगल परिसरात माणसांची गर्दी वाढल्यामुळे वन्यप्राण्यांचा अधिवास अडचणीत येत आहे. याच भागातून जाणारा रस्ता अतिशय उत्कृष्ट दर्जाचा आणि गुळगुळीत आहे. त्यामुळे, या रस्त्यावरून वाहनांची गती अधिक असते. त्यामुळे, वन्यप्राण्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढले असल्याचे मानद वन्यजीव संरक्षक डॉ. जयंत वडतकर यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले. वाघामाय मंदिर परिसरातील गर्दी कमी व्हावी. तसेच, अमरावती - वर्धा या मार्गावर ज्या ठिकाणी वारंवार वन्य प्राण्यांचे अपघात होतात, त्या ठिकाणी गतिरोधक लावणे अत्यंत गरजेचे असल्याचेही वडतकर म्हणाले.
वडाळी पोहरा जंगलात वन्य प्राण्यांचे वास्तव
शहरापासून अवघ्या काही अंतरावर असणाऱ्या वडाळी पोहरा जंगलात मोठ्या संख्येने वन्यप्राण्यांचे वास्तव आहे. या जंगलात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून नीलगाय, खवले मांजर, रान डुक्कर, हरीण, मोर असे विविध प्राणी आणि पक्षी आहेत. या जंगलात एकूण सात ते आठ तलाव असून, या तलावांवर पाणी पिण्यासाठी रात्री आणि पहाटेच्या सुमारास वन्यप्राणी अमरावती - वर्धा मार्ग ओलांडतात. यामुळे या मार्गावर वन्य प्राण्यांचा बळी गेला आहे.
हेही वाचा - Yashomati Thakur Corona Positive : मंत्री यशोमती ठाकूर यांना कोरोनाची लागण