अमरावती: मोर्शी तालुक्यांमध्ये काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र १७ गावातील शेतकऱ्यांच्या बँक याद्या तयार न झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते झालेच नसल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. ही प्रक्रिया सोपी असली, तरी सदर कामाला ग्रामसेवक राज्य संघटनेचा बहिष्कार असल्यामुळे प्रशासनाच्या असहकारामुळे व काही कृषी सहायक, तलाठी यांच्या वेळकाढू पणामुळे मोर्शी तालुक्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहिले असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी व्यक्त केली आहे.
रुपेश वाळके यांनी दिला आंदोलनाचा ईशारा राज्य शासनाने शेतकऱ्यांना तत्काळ मदत देण्याची घोषणा केली. त्यानंतर जिल्ह्याकडे मदत वळती झाली. मात्र ग्रामसेवक आणि कृषी सहायकाच्या असहकार आंदोलनानंतर काही ग्रामसेवक कृषी सहायकांनी खाते नंबरच्या याद्या तयार करण्याचे कामच केले, नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मोर्शी तालुक्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे जवळपास १७ गावातील शेतकऱ्यांच्या खाते नंबरच्या याद्या काही ग्रामसेवक व काही कृषी सहायकांनी अजूनपर्यंत तहसीलदार यांना सादर केलेल्या नसल्यामुळे मोर्शी तालुक्यातील १७ गावातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांच्या नेतृत्वात संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर धडक देऊन तत्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला व प्रशासनावर संताप व्यक्त करण्यात आला.
17 गावातील शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा नाही मोर्शी तालुक्यातील गोराळा, भिलापूर, सालबर्डी, घोडदेव खुर्द, घोडदेव बु. डोंगर यावली, दापोरी, उमरखेड, रसलपूर, बेलखेडा, कासमपूर, पातूर, विठ्ठलपूर, डोमक, घोडगव्हान, इस्माईलपूर, दाभेरी येथील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईची मदत जमा झाली नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे या तालुक्यात ग्रामसेवकांनी खाते नंबरच्या याद्या दिल्याच नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. मोर्शी तालुक्यात काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे वळते होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या १७ गावांमध्ये पैसे वळते झालेच नाही.
शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात तालुका उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य रुपेश वाळके यांनी तत्काळ मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाला जाग येऊन लवकरात लवकर अतिवृष्टी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल का ? हा खरा प्रश्न आहे. ही प्रक्रिया सोपी असली तरी ग्रामसेवकांच्या असहकारामुळे शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासोबतच परतीच्या पावसानेही नुकसान झाले आहे. या परिस्थितीत शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, दिवळीआधी मदत मिळाली असती. तर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असता. मात्र, तसे झाले नाही.
पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके यांनी अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी तहसीलदार गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी यांनी तत्काळ तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे.
या शेतकऱ्यांची उपस्थिती यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका उपाध्यक्ष रुपेश वाळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक उमेश गुडधे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंकुश घारड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रकाश विघे, विलास ठाकरे, गजानन वानखडे, शुभम तिडके, गोलू काळे, श्रीकांत गावंडे, राहुल उघडे, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. मदत तातडीने देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही रुपेश वाळके यांनी यावेळी केले आहे.