अमरावती - राज्यभरात परतीच्या पावसाने मागील १०-१२ दिवसांपूर्वी थैमान घातले होते. याचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. कापूस, सोयाबीन उत्पादकांबरोबर फळबागायतदार शेतकऱयांना याचा मोठा फटका बसल आहे. अशातच यंदा पाऊस जास्त झाल्याने संत्रा उत्पादक शेतकरी यात भरडला आहे. अति पावसाने संत्रा गळून पडत असल्याची विदर्भातील शेतकऱ्यांची ओरड आहे. संत्रा बगीच्यात उत्तम नियोजन करून एका उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने आपला संत्रा गळतीपासून वाचवला आहे.
ग्रामीण भागातल्या उच्चशिक्षित युवकांचा लोंढा शहरांकडे येत आहे. त्यामुळे खेडी ओस पडताना दिसत आहे. पण, काही तरुण याला अपवाद ठरताना दिसत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या उच्चशिक्षित मुलांची मातीसोबत नाळ असल्याने त्यामुळे ते शेतीलाच प्रथम प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शेती करण्याच्या त्यांच्या कल्पना मात्र आधुनिक होत चालल्या आहेत.
मयूर प्रवीणराव देशमुख या युवा शेतकऱयाचा नाविन्यपूर्ण उपक्रम -
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील काजळी गावातील एका उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने संत्रा बागेत विविध नवे प्रयोग व शेद्रिय पद्धतीने शेती करून आपल्या संत्रा बागेला आणखी कसदार बनवले आहे. मयूर प्रवीणराव देशमुख असे या तरुण शेतकऱयाचे नाव असून, एमएडीएडपर्यंतचे त्याचे शिक्षण झाले आहे. त्यांच्याकडे वडिलोपार्जित ३२ एकर शेती आहे. या शेतीमध्ये त्यांच्याकडे संत्राची तब्बल ६ हजार झाडे आहेत. यातील काही झाडे ही सात, काही बारा तर काही झाडे २० वर्षांची आहेत. संत्रा बगीच्याची मशागत न करता त्यात त्याने विविध नाविन्यपूर्ण प्रयोग राबवल्यामुळे यावर्षी त्यांच्या बागेतील संत्रा चांगलाच बहरला आहे. यामध्ये पारंपरिक रासायनिक खताचा कमी वापर व शेद्रिय पद्धतीने शेती करण्याकडे त्यांनी कल दिला आहे. त्यामुळे संत्राची गळती कमी प्रमाणात झाली आहे. ज्या शेतात जास्त रासायनिक पद्धतीचा वापर आहे त्याशेतात संत्रा जास्त गळत आहे. तसेच आम्ही संत्रा बागेला ड्रीपने पाणी न देता दंड पद्धतीने पाणी दिल्याने संत्रा आज टिकून असल्याचे मयूर देशमुख सांगतात.
संत्र्यांचे फळ चांगले येण्यासाठी खालील उपाय करा -
इतर शेतकरी हे संत्राला उन्हाळ्यात पाणी भरपूर देतात. परंतु, आम्ही कमी प्रमाणात पाणी देत असल्याने संत्रा हे टिकून राहते व चमकदार असते, असे मत मयूर यांनी व्यक्त केले आहे. वेगवेगळ्या प्रयोगामुळे या संत्रा बागेमधून मयूर यांना ३०० टन संत्राचे उत्पादन होणार असून, खर्च वगळता लाखो रुपयांचा नफा मयूर देशमुख यांना होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. या शेतीमध्ये मयूर यांचे काका छोटू देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे. मयूर हे आपल्या संत्राच्या बागेत रासायनिक खतांचा वापर फार कमी करतात. तर शेणखताचा ते अधिक प्रमाणात वापर करत आहेत. त्यामुळे बागेतील संत्राला गळती कमी लागते. तसेच फळावर नैसर्गिक चकाकी येते.
नॅशनल रिसर्च सेंटरमधील शास्त्रज्ञ केवळ नावापुरतेच
सध्या मयूर यांच्या संत्राच्या झाडाला एकूण १००० ते १५०० फळ आहेत. पाणी देण्याचे नियोजन पाट्याद्वारे करण्यात येते. नागपूर येथील नॅशनल रिसर्च सेंटरमध्ये केंद्र शासनाने बसवलेले शास्त्रज्ञ हे फक्त पांढरा हत्ती ठरत असल्याची प्रतिक्रिया परिसरातील काही शेतकऱ्यांनी दिली.
संत्रा बागायदार शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तणनाशकांची फवारणी कमी करावी, पावसाचे पाणी आल्यास ते शेताबाहेर काढण्यासाठी नालीचा उपयोग करावा, माझ्याकडे आधी केवळ ६८५ झाडे होती, मात्र सध्या ६ हजार संत्र्यांची झाडे असल्याचे मयूर यांनी सांगितले. यासोबतच शेतीमध्ये शेततळे असणेसुद्धा गरजेचे असल्याचे छोटू देशमुख यांनी सांगितले. मेहनत, जिद्द, चिकाटी आणि शेतीचे योग्य नियोजन केले तर शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न घेता येते हे युवा शेतकरी मयूर देशमुख यांनी आज दाखवून दिले आहे. त्यामुळे देशमुख यांची शेती पाहण्यासाठी अनेक शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देत आहेत.
हेही वाचा - 15 दिवसांत सरकार पडेल अशा पैजा लावल्या, पण... - संजय राऊत