अमरावती : अमरावती शहरातील प्रभात चौक या अतिशय गजबजलेल्या परिसरात (building collapsed Amravati Prabhat Chowk) इमारत कोसळल्यामुळे खळबळ उडाली आहे. या इमारतीखाली दबून 5 लोक मृत पावल्याची (three to four people were trapped under debris) प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी बघणाऱ्यांची प्रचंड गर्दी उसळली आहे.
बचाव कार्य युद्ध स्तरावर : दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही इमारत कोसळत असतांना इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या राजदीप बॅचच्या दुकानात, एकूण चार जण काम करीत होते. हे चौघेही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली दबून ठार झाले. यापैकी दोघांचे मृतदेह लवकरच काढण्यात आले, तर इतर दोघांचे मृतदेह काढण्यास बचाव पथकाला दोन तास मेहनत करावी लागली. एकुणच 5 जण ढीगाऱ्याखाली दबून मृत पावले आहे. दरम्यान हा संपूर्ण परिसर मोकळा करण्यासाठी महापालिकेसह पोलीस प्रशासन युद्ध स्तरावर प्रयत्न करीत आहेत.
खासदार नवनीत राणा घटनास्थळी दाखल : या गंभीर घटनेची माहिती मिळताच, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा घटनास्थळी पोहोचल्या. अमरावतीचे माजी महापौर मिलिंद चिमोटे, विलास इंगोले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत हे देखील घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली असून; पोलीस ही गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सात वर्षांपासून नोटीस मात्र कारवाई शून्य : ही इमारत पाडण्यात यावी तसेच, या इमारतीत असणाऱ्या व्यावसायिकांनी इमारत त्वरित खाली करावी याबाबत महापालिका प्रशासनाच्या वतीने सलग सात वर्षांपासून नोटीस बजावली जात आहे. मात्र नोटीस बजावण्या व्यतिरिक्त कुठलीही कारवाई केली जात नसल्यामुळे, आज अशी गंभीर घटना घडली असल्याचे माजी महापौर मिलिंद शिंदे, विलास इंगोले आणि काँग्रेसचे शहराध्यक्ष बबलू शेखावत 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. या संपूर्ण प्रकरणात जे कोणी अधिकारी जबाबदार आहे तसेच ही इमारत पाडू नये यासाठी शहरातील जे कोणी नेते किंवा कोणी मोठी व्यक्ती जबाबदार असेल, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची आम्ही मागणी करणार असे देखील बबलू शेखावात यांनी म्हटले आहे.