अमरावती - शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे. त्यादृष्टीने शासन प्रयत्नरत असून कृषी प्रशासनानेही गतीने कार्य करावे. जिल्ह्यातील वाळलेल्या संत्रा बागांचे पंचनामे करण्याचे निर्देशही नवनियुक्त कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी दिले आहेत. कृषीमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर कृषीमंत्र्यांचा अमरावती जिल्ह्यातील हा पहिलाच दौरा होता.
अमरावती जिल्ह्यात ६८ हजार हेक्टर पैकी १४ हजार हेक्टर वरील संत्रा बागा वाळल्या आहेत. त्यांचे तातडीने प्राथमिक सर्वेक्षण व पंचनामे करून घ्यावे असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिले. रविवारी अमरावती जिल्ह्यातील वरुड व मोर्शी तालुक्यातील त्यांचा प्रथम दौरा होता. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात तालुकास्तरीय शेतकरी व कृषी मित्र प्रशिक्षण कार्यक्रम वरुड तालुक्यातील मुसळखेडा येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.
कृषीमंत्री पदाच्या रूपाने मोठी जबाबदारी मिळाली आहे. सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या परिस्थितीतून जात आहे. राज्यात चांगले पर्जन्यमान होण्याची गरज आहे. त्यामुळे राज्यात सर्वदूर चांगला पाऊस पडावा अशी प्रार्थना आपण सर्व मिळून करूया, असे आवाहन डॉ. बोंडे यांनी प्रारंभी केले.
मान्सूनच्या हालचाली लक्षात घेता कृषी खात्याने संपूर्ण ताकदीने काम करावे. रिक्त पदे भरण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सकारात्मक आहेत. विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रयत्न करावे. कृषी सहायक हा योजनेच्या अंमलबजावणी यंत्रणेचा महत्वाचा घटक असल्याने कृषी सहायकाला ग्रामपंचायत इमारतीत बसण्यासाठी जागा देण्याबाबत निर्देशही दिले असल्याचे ते म्हणाले. त्याचप्रमाणे पीक विम्याच्या तक्रारींचे वेळीच निराकरण करण्यासाठी विमा कंपनीचा प्रतिनिधी कृषी कार्यालयात उपलब्ध असला पाहिजे. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी ही प्रक्रिया गतिमान व अद्ययावत माहिती ठेवली पाहिजे, असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी संस्कार भारती तर्फे कृषीमंत्री अनिल बोंडे यांची ग्रंथतुला करण्यात आली.