अमरावती- बुधवारी दुपारी पाच तास आलेल्या मुसळधार पावसामुळे अमरावतीमधील मोर्शी तालुक्याला धुवून काढले. सातपुडा पर्वत रांगा, तसेच मोर्शी परिसरात झालेल्या या जोरदार पावसामुळे नळ आणि दमयंती या दोन्ही नद्यांना पूर आला. त्यामुळे मोर्शी शहरातील पेठपुरासह काही भाग पाण्यात बुडाला होता.
या पुरात सातशेहून अधिक घरांचे नुकसान झाले. तर, शेकडो संसार उघड्यावर आले आहेत. घरात पुराचे पाणी शिरल्यामुळे अन्नधान्य, कपडे, पैसा, भांडे, जीवनोपयोगी साहित्य पुरात वाहून गेल्याने जगावे तरी कसे? असा प्रश्न या पूरग्रस्त गावकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. याबाबत प्रशासनाच्यावतीने कुठलीही दखल न घेतल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.