अहमदनगर - निंभारी (ता. नेवासा) या छोट्याशा गावातील शेतकरी कुटुंबातील जनार्दन पवार यांची युवराज आणि प्रताप ही दोन मुले नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्यात पटाईत आहेत. लहानपणापासूनच नवनवीन तंत्रज्ञान विकसीत करण्याकडे त्यांचा कल आहे. शेतीसाठी लागणारी औजारे त्यांनी तयार केली आहेत. लॉकडाऊनच्या काळात काहीतरी वेगळे करण्याचे ठरवत त्यांनी जुन्या पल्सर गाडीचा उपयोग करून एक रुबाबदार कार तयार केली आहे.
मॅकेनिकल डिप्लोमाच्या तिसऱ्या वर्षाला असलेल्या युवराजने आपल्याकडील जुन्या पल्सर गाडीचा उपयोग करत एक कार तयार करण्याचे ठरवले. त्याचे डिझाईन बनवत कारची बांधणी सुरू केली. यात त्याला दहावीत शिकणाऱ्या भाऊ प्रतापचीही साथ मिळाली. त्यांचा मित्र चैतन्य मकासरे हाही त्यांच्या साथीला होता. यांनी लॉकडाऊनच्या काळात दोन महिन्यात मोटरसायकलच इंजिन वापरून एक चारचाकी व्हिटेंज कारचा लूक असलेली गाडी बनवली.
हेही वाचा - विवेकची आत्महत्या आरक्षणासाठी नाही; 'ती' चिठ्ठी बनावट असल्याचा पोलिसांकडून खुलासा
या लहानग्यांनी बनवलेल्या चार चाकीची तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे. पवार बंधूंनी बनवलेली चारचाकी गाडी बघण्यासाठी तालुक्यातून नाही तर जिल्ह्यातून लोक त्यांच्या घरी येत आहेत. दुचाकीचं इंजिन असले तरी गाडी रिव्हर्सही घेता येईल, अशी व्यवस्था केली आहे. या कामात दहावीचा विद्यार्थी असलेल्या प्रतापनेही महत्त्वाचे योगदान दिले. या गाडीत चार जण आरामात बसून सत्तर किलो मीटरच्या वेगाने प्रवास करू शकतात. लॉकडाऊनच्या काळामध्ये पवार बंधूंनी बनविलेली ही चारचाकी नक्कीच मेक इन इंडियासाठी आदर्शवत ठरणारी आहे.
मुलांनी गाडी बनविण्याची संकल्पना मांडली आणि त्यांना पालकांनीही प्रोत्साहन देत पैसा उपलब्ध करून दिला. एक लाख रुपये खर्चुन घरी असलेल्या १५० सीसीच्या पल्सरगाडीत आवश्यक बदल करत त्यांनी चारचाकी गाडीची निर्मिती केली आहे. त्यासाठी सलग दोन महिने अथक परिश्रम त्यांनी घेतले. बनवलेली ही चारचाकी रस्त्यावर धावली याचा आम्हाला अभिमान वाटत असल्याचे त्यांची आई अनुराधा जनार्धन पवार यांनी सांगितले.
हेही वाचा - महावितरणचा झटका..! लॉकडाऊन काळात हॉटेल बंद, तरीही सहा महिन्यात चार लाखांचे लाईट बिल