अहमदनगर - श्रीगोंदा तालुक्यात झालेली चार जणांची हत्या ही 'ड्रॉप' अर्थात स्वस्तात सोने देवाण-घेवणीतून झाल्याचे पोलीस तपासात समोर आल्याची माहिती अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी दिली. स्वस्तात सोने खरेदी आणि हत्येत सहभागी असलेले आरोपी हे जळगावचे आहेत. या सर्व आरोपींना जळगाव पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेच्या मदतीने अटक केल्याची माहितीही अखिलेशकुमार यांनी दिली आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रोगोंदा तालुक्यातील सुरेगाव येथील नातीक कुंजीलाल चव्हाण ( वय ४०), श्रीधर कुंजीलाल चव्हाण (वय ३५), नागेश कुंजीलाल चव्हाण ( वय १४), लिंब्या हाबर्या काळे (वय २२) यांची 20 ऑगस्टला हत्या झाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार यांनी स्वतः जातीने तपास करत या गुन्ह्याची उकल केली.
हा गुन्हा 'ड्रॉप' अर्थात स्वस्तात सोने खरेदीतून झाला असून यातील आरोपी जळगाव जिल्ह्यातील असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. तीन लाखात पाऊण किलो (250 ग्राम) सोने खरेदीचा व्यवहार ठरला होता. मात्र पैसे मिळताच पैसे देणाऱयांवर हल्ला करण्यात आला. त्याला प्रत्युत्तर म्हणून जळगावच्या नरेश जगदीश सोनवणे याने चाकूने पैसे लूटमार करणाऱ्यांवर जोरदार हल्ला केला, यात चारजण ठार झाले.
घटनास्थळी पोलिसांना मिळालेल्या पुराव्यावरून शोध घेतला असता या घटनेत जळगाव येथील नरेश जगदीश सोनवणे, आशा जगदीश सोनवणे, कल्पना किशोर जगदाळे, प्रेमराज जगदीश पाटील, योगेश मोहन ठाकर हे पाचजण स्वस्तात सोने खरेदीसाठी आल्याचे समोर आले. या सर्वांना जळगाव गुन्हे शाखेच्या मदतीने ताब्यात घेण्यात आले होते. या सर्वांना नगर पोलिसांनी अटक केली असून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.