अहमदनगर- अकोले तालुक्यातील देवगाव येथील फूड मदर म्हणून प्रसिद्ध असलेल्या ममताबाई देवराम भांगरे यांच्या परसबागेतील म्हाळुंगीची फळे सर्वांचे आकर्षण ठरत आहेत. म्हाळुंग ही दुर्मिळ आणि डोंगर भागात आढळणारी लिंबूवर्गीय पिकातील एक वनस्पती आहे. म्हाळुंगीची फळाचा उपयोग आयुर्वेदात पोट दुखीच्या संदर्भातील आजारांवर होतो. तसेच अन्य आजरावर देखील याचा उपयोग केला जात असल्याचे ममताबाईंनी सांगितले.
![म्हाळुंग फळ](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-mahalungfruit-26-visulas-mh10010_26012021010024_2601f_1611603024_1058.jpg)
या आजरावर म्हाळुंग फळ उपयोगी
अकोले तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये पाळीव प्राण्यांच्या पोटात लोखंड, पत्रा, तार किंवा तत्सम काही वस्तू जर गेली तर त्या वस्तूंचे पोटातच पाणी करण्यासाठी म्हाळुंग वनस्पतीचा रस जनावरांना पाजला जातो. त्याच बरोबर किडनीमध्ये स्टोन झाल्यास व मुतखड्याचा आजार असलेल्या रुग्णांना या फळांचा रस दिल्यास आजार बरा होत असल्याचा अनेक अनुभव लोकांना आले असल्याचे ममताबाईंनी सांगितले.
ममताबाई यांच्या परसबागेमध्ये विविध वनस्पतींची लागवड
मुळातच निसर्गाशी एकरूप होत आपले जीवन जगणाऱ्या अकोले तालुक्यातील देवगाव येथील ममताबाई त्यांच्या परिवाराने असंख्य रानभाज्या आणि परसबागेतील रूपे आपल्या घरा सभोवताली लागवड केलेली आहेत. या परिसरातील अनेक शेतकरी आणि आदिवासी महिलांसाठी आदर्श ठरलेल्या ममताबाईंनी अतिशय कष्टाने ही परसबाग फुलवली आहे. त्यामध्ये विविध वनस्पती त्यांनी लागवड केलेली आहे. नामशेष होत चाललेली अबई असो किंवा कोहीरीची भाजी, चाई, बडदा, सुरण कंद , करंज कंद ,रान अळू यांची मोठ्या प्रमाणावर त्यांनी जपवणूक केलेली आहे.
![ममताबाई देवराम भांगरे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ahm-shirdi-mahalungfruit-26-visulas-mh10010_26012021010024_2601f_1611603024_802.jpg)
शेतकऱ्यांना लागवडीसाठी रोपे
म्हाळुंगाचे रोपही ममताबाईंनी आपल्या बागेत तीन- चार वर्षांपूर्वी लागवड केली होती. त्याला आता फळे लागण्यास सुरुवात झाली आहे. सध्या त्यांच्या झाडाला चार मोठ्या आकारायची माळुंगाची फळे लागलेले आहेत. ममताबाईंच्या घरी शेतकरी आणि अभ्यासू मंडळीचा राबता असतो. त्यामुळे म्हाळुंगाची फळे त्यांचे खास आकर्षण ठरलेले आहे. ममताबाईंच्या कुटुंबाचा मानस आहे, की आत्ता लागलेली फळे बियाण्यांसाठी जपून ठेवायचे व त्यापासून भरपूर रोपे तयार करायची. ही तयार केलेली रोपे शेतकऱ्यांना लागवडीस द्यायची. त्यासाठी त्यांनी फळांची काढणी न करता झाडावरच या फळांना पिकून दिलेले आहे.