अहमदनगर (शिर्डी) - राहुरी येथील दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास राधुजी दातीर यांचे काल (मंगळवार दि. ६) रोजी दुपारच्या सुमारास अपहरण झाले होते. आज त्यांचा मृतदेह राहुरी कॉलेज रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोकळ्या जागेत आढळून आला. यामुळे राहुरी तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
शहरात व तालुक्यात दहशतीचे वातावरण-
रोहिदास दातीर हे काल (दि. ६) रोजी दुपारी साडेबाराच्या दरम्यान राहुरीतील मल्हारीवाडी रस्त्याने दुचाकीवरून आपल्या घरी जात असताना स्कॉर्पिओतून आलेल्या अज्ञात लोकांनी त्यांना मारहाण करीत बळजबरीने गाडीमध्ये नेऊन अपहरण केले होते. घटनास्थळी दातीर यांची दुचाकी व चपला आढळल्या. हि माहिती कळताच पोलिसांचे एक पथक त्यांच्या मागावर रवाना झाले होते. काल पोलीसांकडून त्यांचा दिवसभर शोध सुरू होता. मात्र आज दातीर यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे राहुरी शहरात व तालुक्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेचा सर्वत्र निषेध-
दातीर हे दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष होते. ते स्वत: एक साप्तहिक चालवत होते. त्यातून ते नेहमी समाजातील काही अन्यायकारक घटनांना वाचा फोडून न्याय मिळवून देण्याचे करत असत. त्यांनी संघटनेच्या व साप्तहिकाच्या माध्यमातुन अनेक पत्रकारांचे तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले होते. त्यामुळे अनेक घोटाळे उघडकीस आले. दातीर यांच्या हत्येमुळे पत्रकरीता क्षेत्रात मोठी दहशत निर्माण झाली आहे. या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त होत आहे.
हेही वाचा- महाराष्ट्रात लसीचा तुटवडा, केवळ ३ दिवस पुरेल एवढी लस राज्यात उपलब्ध - आरोग्यमंत्री