अहमदनगर : चालू खरीप हंगामामध्ये सर्वत्र अतिवृष्टीने पिकांना फटका (Even during heavy rains) बसला आहे. बहुतेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. यातून काही शेतकरी सावरले तर काही शेतकरी जमीनदोस्त झाले. अशीच काही परिस्थिती बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे (Bijmata Padmashri Rahibai Popare) यांच्यावर सुद्धा ओढावली होती.
शेती पुन्हा बहरली : अतिवृष्टीमुळे भाजीपाला पिकांची लागवड त्यांना तब्बल तीन वेळेला करावी लागेल. घरात होते नव्हते हे सर्व बियाणे शेतामध्ये पेरावे लागले. जागतिक तापमानात वाढ व हवामान बदलाचा फटका यंदा त्यांच्या शेतीलाही बसला. मात्र जिद्दी आणि कष्टाळू राहीबाईंनी निसर्गापुढे हार मानली नाही. संधी मिळताच भाजीपाला पिकांच्या लागवडी त्या करत राहिल्या. चालू हंगामात बियाणे तयार होणार नाही अशीच काहीशी परिस्थिती होती. निराश न होता त्यांनी घरातील सदस्यांना बरोबर घेत पुन्हा एकदा विविध भाजीपाला पिकांची लागवड केली. कारली, दोडका, घोसाळी, वाल, चंदन बटवा, मिरची, टोमॅटो, वांगी, डांगर भोपळा, दुधी भोपळा, काकडी, खरबूज इत्यादी विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांच्या अस्सल वाणांची लागवड त्यांनी यशस्वी करून दाखवली आहे. जिद्द आणि पूर्णपणे झोकुन देत केलेल्या कामामुळे त्यांची बियाणे शेती पुन्हा एकदा बहरली (cultivated farm with her tireless efforts) आहे.
50 गावांमध्ये कार्यरत : राज्यासह इतर राज्यातूनही मोठ्या प्रमाणावर गावरान बियांची मागणी त्यांच्याकडे होत असते. चालू हंगामात अतिवृष्टीमुळे बियाणे निर्मितीवर त्याचा परिणाम झाला आहे. त्यातून सावरत त्यांनी शेतकरी राजासाठी दर्जेदार व अस्सल गावठी बियाणे निर्माण केले आहे. आपल्या घरी येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला बियाणे देता यावे, यासाठी त्यांनी कळसुबाई परिसर बियाणे संवर्धन सामाजिक संस्था स्थापन केली आहे. बायफ या आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त संस्थेच्या मार्गदर्शनाने ही संस्था आदिवासी भागातील सुमारे 50 गावांमध्ये कार्य करत आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी देशी बियाण्याकडे वळून शेती समृद्ध करावी, असे आवाहन पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी केले आहे.