अहमदनगर- मुळात ग्रामपंचायत निवडणुका या पक्षचिन्ह वा पक्ष पातळीवर न होता शक्यतो स्थानिक परिस्थितीनुसार पॅनल पातळीवर लढवल्या जातात, अशात अनेक गावांत एकाच पक्षाला माननारे पण स्थानिक पातळीवर भिन्न विचार असलेले दोन गट एकमेकांविरोधात निवडणुका लढवतात. अनेकदा या निवडणुकांकडे तालुक्याचे कारभारी, प्रमुख नेते, आमदार हे लक्ष न देता सोयीस्कर अंतर ठेवतात, जो निवडूण येईल तो आपलाच अशी त्यामागे भूमिका असते. मात्र असे असताना दिग्गज नेते आपल्या मूळ गावी होणाऱ्या निवडणुकांबाबत अतिशय संवेदनशील असतात, आपण ज्या पॅनलला समर्थन दिले आहे तो पॅनलच निवडूण यावा यासाठी ते आग्रही असतात. मात्र या निवडणुकीत जर त्यांचा पराभव झाला तर त्यांच्यावर मोठी नामुष्की ओढावते. त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होते.
नेमकी हीच परिस्थिती अहमदनगर जिल्ह्यातील राज्यात दबदबा असलेल्या दोन नेत्यांवर ओढवली असून, हे दोन्ही नेते भाजपचे आहेत. काँग्रेस काळात नेहमी मंत्रीपदी राहिलेले माजी विरोधीपक्ष नेते आणि सध्या भाजपमध्ये असलेले राहत्याचे आमदार राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री राहिलेले जामखेडचे राम शिंदे यांना यावेळी आपल्याच गावकऱ्यांनी धक्का दिला आहे. लोणी खुर्दमध्ये विखे समर्थक पॅनलचा तर, चौंडीमध्ये राम शिंदे यांच्या पॅनलचा पराभव झाला आहे.
...तरीही विखे समर्थक पॅनलचा परभाव
नगर जिल्ह्यातील जाणकार पत्रकारांनी याबाबत आपली मते व्यक्त केली असून, या निकालातून या नेत्यांच्या पुढील राजकारणावर त्याचा परिणाम होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली आहे. लोणीत तर विखे आमदार आहेत, त्यांचे पुत्र खासदार आहेत तर पत्नी या माजी जिल्हापरिषद अध्यक्ष राहिलेल्या आहेत. प्रचंड शैक्षणिक जाळे, सहकारी साखर कारखाना हातात असताना राधाकृष्ण विखे यांना मानणारा पॅनल पराभूत होणे यावर अनेकांना विश्वास बसत नाही.
आ.रोहित पवारांनी लावली पूर्ण ताकत
आमदार रोहित पवारांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये नियोजनबद्ध प्रचार केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी काँग्रेस-शिवसेने बरोबर मोट बांधली. कर्जत-जामखेडमध्ये त्यांनी उभी केलेली कार्यकर्त्यांची फळी, नियोजनबद्ध कार्यक्रम या जोरावर आ.रोहित पवार यांनी थेट राम शिंदेंच्या मूळ गावात अर्थात चौंडीमध्ये राम शिंदेंना पराभवाचा धक्का दिला. राम शिंदे यांचा पुतण्या अक्षय शिंदे यांना पाठिंबा देऊन रोहित पवार यांनी तिथे राम शिंदे यांचा पराभव केला.