मुंबई - आकारलेले शुल्क न भरल्यामुळे विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे यजमानपद गमावण्याची वेळ भारतावर आली आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारताकडून यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय या प्रकरणात भारतीय बॉक्सिंग महासंघाला ५०० अमेरिकन डॉलर एवढा दंड ठोठावण्यात आला आहे.
याविषयी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने सांगितले की, 'स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी, जो देश इच्छुक असतो त्याला शुल्क भरावे लागते. भारतातील दिल्लीमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात येणार होती. पण त्यांनी यजमानपदाचे शुल्क भरले नाही. त्यामुळे त्यांच्याकडून यजमानपद काढून घेण्यात आले आहे. याशिवाय त्यांना ५०० अमेरिकन डॉलर एवढी रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितले आहे.'

दरम्यान, विश्व अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेच्या यजमानपदाचा निर्णय मंगळवारी झाला आणि हे यजमानपद सर्बियाला देण्यात आले. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या यजमानपदासाठी २०१७ मध्ये आपला अर्ज दाखल केला होता. पण भारतीय बॉक्सिंग महासंघ शुल्क भरण्यास अपयशी ठरली. यामुळे भारताने स्पर्धेचे यजमानपद गमावले.
हेही वाचा - धक्कादायक!.. डोपिंग प्रकरणात सापडले 'खेलो इंडिया युथ गेम्स'मधील १५ खेळाडू
हेही वाचा - भारतीय पॅरालिम्पिक समिती मान्यता मिळवण्यासाठी प्रयत्न करणार