परभणी - 'प्रत्येक पालकाला त्यांच्या मुलांनी दहावीला 90-95 टक्के गुण घेऊन पुढे डॉक्टर, इंजिनिअर व्हावे, असेच वाटते. मात्र खेळांमध्ये देखील भविष्य घडविता येते. खेळांमध्ये आवड ठेवून अभ्यासावरही लक्ष केंद्रित करता येते', अशी भावना राष्ट्रीय कबड्डीपटू साक्षी चव्हाण हिने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे साक्षीने यावर्षीच राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कास्य पदक पटकावत दहावीत देखील 96 टक्के गुण घेवून नेत्रदीपक यश संपादन केले आहे. याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
जिद्द आणि कामाप्रती निष्ठा असेल तर कुठलेही यश संपादन करता येते, हेच मानवत येथील साक्षी चव्हाण हिने सिद्ध करून दाखवले आहे. मानवत स्पोर्टस अकॅडमीची खेळाडू असलेली साक्षी चव्हाण हिने नोव्हेंबर-2019 मध्ये झालेल्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. खेळाची तयारी करत असताना तिने दहावीच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही. नोव्हेंबर महिन्यानंतर अवघ्या तीन महिन्यात तिने तिचा दहावीचा उर्वरीत अभ्यासक्रम पूर्ण करत घवघवीत यश संपादन केले आहे. राज्यातील खेळाडूमधून 96.60 टक्के गुण घेणारी साक्षी चव्हाण ही राज्यात प्रथम ठरली आहे.
याबाबत बोलतांना साक्षीने 'जिद्द असेल तर कुठलीही यश संपादन करता येते, अनेक पालकांना आपल्या मुलांनी 90-95 टक्के गुण घेऊन डॉक्टर, इंजिनियर व्हावे, असेच वाटते; मात्र मात्र खेळांमध्ये देखील मुलांना भविष्य घडवू दिले पाहिजे. माझ्या आई-वडिलांनी माझ्या अभ्यासासोबतच माझ्या खेळाकडे देखील तितकेच लक्ष दिले आहे. मला वेळोवेळी प्रोत्साहन दिल्याने मी कबड्डीमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळून यश संपादन करू शकले. शिवाय अभ्यासाकडे देखील लक्ष देऊन 96.60 टक्के गुण मिळवले आहेत. खेळाडूंमध्ये ती प्रथम ठरल्याचे देखील साक्षीने सांगितले.
दरम्यान, साक्षीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल जिल्हा कबड्डी असोशियनचे अध्यक्ष तथा माजी मंत्री आमदार सुरेश वरपुडकर यांनी साक्षीचा गौरव केला. तर साक्षीच्या या दुहेरी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.