नवी दिल्ली - भारतीय ऑलिम्पिक संघाचे(आयओए) अध्यक्ष नरिंदर बत्रा यांच्या हस्तक्षेपानंतर राष्ट्रीय नौकायन महासंघाने (आरएफआय) रोईंगपटू दत्तू भोकनळ वरील बंदी उठवली आहे. 2018 च्या आशियाई स्पर्धेनंतर भोकनळवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
आशियाई स्पर्धांत रोईंगमध्ये सुवर्णपदक मिळवणाऱ्या चारजणांच्या संघात दत्तू भोकनळचा समावेश होता. मात्र, एकेरीमध्ये त्याने स्पर्धा अर्धवटच सोडली होती. त्यामुळे मागच्या वर्षी मार्च महिन्यात राष्ट्रीय नौकायन महासंघाने भोकनळवर बंदी घातली होती.
हेही वाचा - 'संघाच्या हिताचे असेल तर मी कर्णधारपद सोडण्यास तयार'
नावेतून पडल्याने आणि प्रकृती ठीक नसल्याने आपण स्पर्धा अर्ध्यातच सोडली, असे स्पष्टीकरण दत्तू भोकनळने दिले होते. या स्पष्टीकरणावर समाधानी नसलेल्या राष्ट्रीय नौकायन महासंघाने त्याच्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्षांनी आरएफआयला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले होते. त्यानंतर भोकनाळवरील बंदी उठवण्यात आली आहे.