नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियासह सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा बाहेर पडला आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला आहे. शुक्रवारी कॅनबेरा येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यादरम्यान जडेजाच्या डोक्याला दुखापत झाली. त्याच्या जागी बदली खेळाडू म्हणून युझवेंद्र चहलला संघात घेण्यात आले. चहलने या संधीचे सोने करत तीन गडी बाद केले.
हेही वाचा - फिरकीपटू मुजीब-उर-रहमानला कोरोना
रवींद्र जडेजाने पहिल्या टी-२० सामन्यात २३ चेंडूत नाबाद ४४ धावा केल्या. हा सामना जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. जडेजा अद्याप बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली असल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. शनिवारी त्याची चाचणी केली जाईल.
यानंतर निवड समितीने ठाकूरला टी-२० मालिकेसाठी संघात स्थान दिले. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो संघाचा भाग होता. तिसऱ्या सामन्यात खेळताना त्याने प्रभावी गोलंदाजीही केली होती.
भारताच्या नावावार पहिला टी-२० सामना -
पदार्पणवीर टी. नटराजन आणि युझवेंद्र चहल यांनी केलेल्या दमदार गोलंदाजीमुळे पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर ११ धावांनी विजय नोंदवला. रवींद्र जडेजाचा 'कन्कशन सबस्टिट्युट' म्हणजेच बदली खेळाडू म्हणून मैदानात उतरलेल्या चहलने ऑस्ट्रेलियाच्या आरोन फिंच, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेडला बाद करत यजमान संघाच्या डावाला खिंडार पाडले. २० षटकात ऑस्ट्रेलियाचा संघ ७ बाद १५० धावा करू शकला. चहलला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.