हैदराबाद - टीम इंडियाचे मुख्य कोच रवि शास्त्रींनी कोविड-19 विरुद्ध सुरू देशाच्या लढाईला आतापर्यंतच्या सर्व विश्वचषकाहून मोठी लढाई म्हटले आहे. शास्त्रींनी आपल्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ संदेश पोस्ट केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे, की कोरोना महामारीने संपूर्ण मानवजातीपुढे संकट उभे केले आहे. कोविड-19 महामारीवर विजय मिळवणे विश्वचषकावर नाव कोरण्यासारखी दैदिप्यमान कामगिरी ठरेल.
मोठ्या लढाईसाठी आपले सर्वस्व पणाला लावले जाते. आपल्यासमोर जे कोरोनाचे आव्हान आहे, ते सर्वसाधारण विश्वचषकासारखे नाही. हे आव्हान आतापर्यंतच्या सर्व विश्वचषकाहून मोठे आहे. या मुकाबल्यासाठी केवळ ११ लोक मैदानात नाहीत तर एक अब्ज ४० कोटी लोक मैदानात उतरले आहेत. तर मित्रांनो चला.. एक अब्ज ४० कोटी लोक एकत्र येऊन या कोरोनाला हरवू व मानवतेचा विश्वचषक जिंकू.
रवि शास्त्रींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करताना म्हटले, की मोदी सर्वात पुढे राहून या आव्हानाचा मोठ्या धैर्याने सामना करत आहेत. शास्त्री म्हणाले, की मित्रांनो या लढाईत आपण जिंकू शकतो. मात्र यासाठी काही सामान्य नियमांचे पालन करणे जरुरी आहे. यासाठी सरकारच्या सुचनांचे पालन करा, घरात रहा व सोशल डिस्टन्सिंग पाळा. आपल्याला असे पंतप्रधान मिळाले आहेत. जे पुढे येऊन या वैश्विक महामारीचा सामना करत आहेत.
लोकांनी सरकारी आदेशांचे पालन केले पाहिजे. जे राज्य सरकारचे असोत की केंद्र सरकारचे किंवा आपला जीव धोक्यात घालून कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्यांकडून येवोत. हे आव्हान सोपे नाही मात्र विजय मिळवण्यासाठी काही दु:ख सहन केले पाहिजे आणि कोरोनाच्या साखळीला तोडले पाहिजे.