मुंबई - ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत दैदिप्यमान यश मिळवल्यानंतर भारतीय संघासमोर आता इंग्लंडचे आव्हान आहे. इंग्लंडचा संघ भारतीय दौऱ्यावर येणार असून उभय संघातील कसोटी मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. यातील पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली आहे. शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघाची निवड नंतर केली जाणार आहे. पण, या कसोटी मालिकेला सुरूवात होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजाने दुखापतीमुळे या मालिकेतून माघार घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेदरम्यान, रविंद्र जडेजाच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. यामुळे त्याला चौथ्या कसोटीतून माघार घ्यावी लागली होती. आता त्याला या दुखापतीतून सावरण्यासाठी सहा आठवड्यांचा अवधी लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. दरम्यान, पहिल्या दोन सामन्यांसाठी निवड समितीने जाहीर केलेल्या १८ जणांच्या संघात जाडेजाचा समावेश नव्हता. पण त्यानंतरच्या दोन कसोटीसाठी त्याच्या नावाच विचार केला जाणार होता.
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून विराट कोहलीचे पुनरागमन होत आहे. तो पालकत्व रजा संपवून पुन्हा संघात येणार आहे. विराट शिवाय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांचेही दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन होत आहे. फिरकीपटू अक्षर पटेल याला पहिल्यांदाच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.
असा आहे पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, शुबमन गिल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हार्दिक पांड्या, केएल राहुल, ऋषभ पंत, वृद्धीमान साहा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर.
हेही वाचा - भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू मायदेशी परतले; मुंबईत जोरदार स्वागत