नवी दिल्ली - भारताचे बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रेंकीरेड्डी सध्या हैदराबाद येथील राष्ट्रीय शिबिरामध्ये भाग घेणार नाहीत. कोरोनाव्हायरसवर खबरदारी म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला आहे. दुहेरी प्रकारातील यशस्वी मानली जाणारी ही जोडी दोन आठवड्यानंतर शिबिरात भाग घेऊ शकते. चिराग शेट्टी सध्या त्याच्या घरी मुंबईत असून सात्विकसाईराज आंध्र प्रदेशच्या अमलापूरममध्ये आहे.
या जोडीने यावर्षीच्या थायलंड ओपनचे विजेतेपद तर, फ्रेंच ओपनचे उपविजेतेपद पटकावले आहे. याविषयी २३ वर्षीय चिराग म्हणाला, ''सराव शिबिर पुन्हा सुरू झाले हे ऐकून आनंद झाला. परंतु शिबिरात जाण्यापूर्वी आम्हाला काही आठवडे थांबावे लागले.''
कोरोना विषाणूमुळे चार महिने कोर्टापासून दूर राहिल्यानंतर विश्वविजेती पी.व्ही. सिंधु, बी. साई प्रणीत आणि एन सिक्की रेड्डी हे बॅडमिंटनपटू हैदराबादच्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमी येथे दाखल झाले. तेलंगाणा राज्य सरकारने १ ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानंतर भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) हे सराव शिबिर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सरकारने ५ ऑगस्टपासून क्रीडा उपक्रम सुरू करण्यास मान्यता दिली आहे.
आरोग्य मंत्रालय आणि प्राधिकरणाने ठरवलेल्या एसओपीच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन हे प्रशिक्षण दिले जाईल. तसेच राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांची दखल घेतली जाईल.