मुंबई - गेल्या काही दिवसांपासून आयपीएलला सुरूवात झाली आहे. क्रिकेटचे चाहते मोठ्या आतुरतेने वाट पाहात असलेल्या अंतिम सामन्याचा दिवसही जवळ आला आहे. येत्या १२ मे रोजी मुंबई आणि चेन्नईमध्ये अंतिम लढत रंगणार आहे, अशात प्रेक्षकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे.
काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आयपीएलच्या या अंतिम सामन्यावेळी प्रेक्षकांना सलमान आणि कॅटरिनाचीही झलक पाहायला मिळणार आहे. आयपीएलची लोकप्रियता पाहता आगामी भारत चित्रपटाचं प्रमोशन आयपीएलच्या माध्यमातून आगळ्यावेगळ्या पद्धतीने करण्याचा निर्णय दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघेही सामन्यादरम्यान स्टेडियमवर हजेरी लावणार नसून एक सेगमेंट होस्ट करणार आहेत. जे स्टूडिओमधूनच लाईव्ह केलं जाणार आहे. सलमान आणि कॅटरिनाच्या सुरक्षेच्या कारणास्तव दिग्दर्शकाने हा निर्णय घेतला आहे. भारत चित्रपटात सलमान आणि कॅटरिनाशिवाय दिशा पटानी आणि सुनील ग्रोवर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत. येत्या ५ जूनला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.