नवी दिल्ली - तुर्कस्तानचे पंतप्रधान रेसिपतैयीन एर्दोगान यांनी शुक्रवारी पाकिस्तानच्या संसदेत भाषण दिले. यावेळी त्यांनी काश्मीर प्रश्नावरून पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला. तसेच कोणत्याही परिस्थितीत काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला सहकार्य करण्याचे वक्तव्य केले. या वक्तव्यानंतर भारतीय परराष्ट्र विभागाने पंतप्रधान एर्दोगान यांना भारताच्या अंतर्गत प्रश्नामध्ये न पडण्याचा इशारा दिला आहे.
कोणतेही वक्तव्य करण्याआधी खरी परिस्थिती जाणून घ्या. पाकिस्तानकडून दहशतवाद पसरवला जातोय याबाबत तुमची आधी समज वाढवा, असे म्हणत भारताने तुर्कस्तानला खडसावले आहे. पाकिस्तान आणि तुर्कस्तानने मिळून एक ठराव देखील मंजूर केला आहे. मात्र, भारताने हा ठराव आणि काश्मीरबाबत केलेली सर्व वक्तव्ये फेटाळून लावली आहेत.
काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. संयुक्त राष्ट्राच्या ठरावाला अनुसरून भारत आणि पाकिस्तानने त्यांच्यातील वाद सोडवायला पाहिजे, असे ठरावात म्हटले आहे. यामध्ये काश्मीरचाही समावेश करण्यात आला आहे. काश्मीरची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर पाकिस्तान भारत विरोधी राष्ट्रांची मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहे. मलेशिया आणि तुर्कस्तान या देशांनी उघडपणे पाठिंबा दिला आहे. मात्र, मुस्लिम राष्ट्रांची संघटना असलेल्या ओआयसीने(OIC) काश्मीरवर परराष्ट्रमंत्री स्तरावर चर्चा करण्यास नुकताच नकार दिला आहे. काश्मीर प्रकरणावरून जगभरामध्ये भारताची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे.