इस्लामाबाद (पाकिस्तान) - जोपर्यंत जगातील सगळे देश एकत्र कोरोना विषाणूवर उपचारासाठी उपाय शोधत नाही. तोपर्यंत आपण कोरोनावर मात करू शकत नाही, असे वक्तव्य पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी गुरुवारी केले.
जोपर्यंत कोरोनाला जागतिक समस्या मानून निराकरण केले जात नाही, तोपर्यंत जग या मंदीपासून मुक्त होणार नाही, असेही खान म्हणाले. या कठीण प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी विकसनशील देशांना मदत केल्याबद्दल त्यांनी जी-२० परिषदेचे आभार मानले. विकसित देशांनी एकत्र येऊन यावर मार्ग काढला तरच आपण सर्व त्यातून मुक्त होऊ. जर आपण याला जागतिक समस्या मानले तरच जग त्यातून बाहेर येईल, असे खान म्हणाले.
पाकिस्तानमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ६१,००० झाली आहेत.तर आतापर्यंत १,२६० जणांचा म्रृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. पाकिस्तानमध्येही लॉकडाऊन लावण्यात आला आहे. कोरोनाने जागतिक अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम झाले आहेत. पाकिस्तावरदेखील त्याचा परिणाम झाला आहे. जागतिक स्तरावर मागणी कमी झाल्याने आमच्या निर्यातीवर त्याचे परिणाम झाले आहे, असे ते म्हणाले.
जगभरात ५९,२५,०६३ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, आतापर्यंत ३,६३,१७७ लोकांचा कोरोनामुळे म्रृत्यू झाला आहे.