ठाणे - शिवसेनेने कधीही श्रेयवाद केला नाही. जे लोकांच्या हिताचे आहे, ज्या प्रकल्पातून लोकांना फायदा होणार आहे, तेच काम शिवसेनेने केले आहे. समृद्धी महामार्ग ( Samruddhi Highway Inauguration ) हा गेम चेंजर प्रकल्प असून आंतरराष्ट्रीय दर्जाचा रस्ता आहे. तसेच या रस्त्याचे नागपूर ते शेलूपर्यंत २१० किलोमीटरचा रस्त्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या सोयीसाठी येत्या १ मेला महाराष्ट्र दिनाच्या दिवशी पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुला करणार असल्याचे राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे ( Minister Eknath Shinde ) यांनी सांगितले आहे.
महाराष्ट्र दिनी होणार पहिल्या टप्प्याचे उद्घाटन : या महामार्गाला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यावेळी देखील मी एमएसआरडीसी खात्याचा मंत्री होतो आणि त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला. तसेच कोविड काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या महामार्गाचे काम सुरळीतपणे सुरू राहिले. त्यामुळे आम्ही कोणाचे श्रेय नाकारत नसल्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. लोकाभिमुक प्रकल्पांना शिवसेनेने कधी विरोध केला नाही. विरोध केला असता तर हा रस्ता झाला नसता. सुरुवातीला या रस्त्याला लोकांचा विरोध होता तो मी मंत्री म्हणून स्वतः पुढाकार घेऊन दूर केला, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. नागपूर ते शेलूपर्यंत काम पूर्ण झाले आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे योगदान कोणाला सांगायची गरज नाही. बाळासाहेबांचे नाव देऊन समृद्धी महामार्गाची उंची वाढणार आहे. १ मेला महाराष्ट्र दिनी समृद्धी महामार्गाच लोकार्पण करणार असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
'राजकीय स्वार्थ पोटी केलेली कारवाई दुर्दैवी' : आज ईडीने संजय राऊत यांची 11 कोटी 55 लाखांची मालमत्ता जप्त केलेली आहे. यावरच एकनाथ शिंदे यांनी ही कारवाई दुर्दैवी असल्याचे सांगत राजकीय आकसापोटी स्वार्थापोटी जर अशी कारवाई होत असेल तर हे दुर्दैवी असल्याचे सांगितले आहे.
हेही वाचा - Sanjay Raut On ED Action : मनी लॉन्ड्रिंग सिद्ध झाल्यास सगळी प्रॉपर्टी भाजपला दान करेल : संजय राऊत आक्रमक