पुणे - धर्मनिरपेक्षता ही संकल्पना भारतासारखा देश एकसंध ठेऊ शकते. त्याच संकल्पनेला छेद देण्याचा आज प्रयत्न होत आहे. तो यशस्वी होऊ देता कामा नये. धर्मनिरपेक्षतेला विरोध असणारेच आज सत्तेवर आहेत, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
'आंतरभारती' दिवाळी अंकाचे शरद पवार यांच्या हस्ते मोती बाग या निवासस्थानी मंगळवारी सकाळी झाले. तेव्हा ते बोलत होते. हिंदू - मुस्लीम व इतर समाजात अंतर निर्माण केले जात आहे. कटुतेला शासकीय आधार दिला जात आहे. राजसत्तेचा वापर केला जात आहे. म्हणून आपण धर्मनिरपेक्ष विचारांचा प्रसार केला पाहिजे. या कामी जाणकारांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे शरद पवार म्हणाले.
आंतरभारती या दिशेने काम करेल -
भाषा, जात, धर्म यात समाज दुभंगता कामा नये. आंतरभारती या दिशेने काम करेल, अशी आशा आहे. या कार्याला मी शुभेच्छा देतो. साने गुरुजींनी एकसंध समाजासाठी योगदान दिले. त्यांचे आंतरभारतीचे स्वप्न आपण सर्वांनी साकार केले पाहिजे. आंतरभारतीचे विचार अन्य भाषांमध्ये गेले पाहिजेत. वैचारिक दिशा देणारा हा अंक आहे, असे पवार म्हणाले. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष आणि अंकाचे अतिथी संपादक लक्ष्मीकांत देशमुख, आंतरभारतीचे डी.एस. कोरे आदि उपस्थित होते.