पुणे - ओंगे, भोंगे आणि सोंगे यांच्या रुपात भाजपचे चेहरे बाहेर आले असून मनसेचा कारभार म्हणजे आज उधार आणि उद्या रोख असा सुरू आहे, असा टोला मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरेंना लगावला ( Kishori Pednekar Criticism on Raj Thackeray ) आहे. त्याचबरोबर मनसेच्या सगळ्या सभा या भाजपच्या उधारीवर चालू आहेत. त्यांच्यासोबत भाजप जाणारच कारण त्यांचा कुणालाच विकासाचे राजकारण नको आहे. त्यांना फक्त हिंदुत्त्वाचे कार्ड काढून घाणेरडे राजकारण करायचे आहे, अशी टीका करतच आमचे हिंदुत्त्व बाळासाहेबांनी दिलेले आहे. मुळात हिंदुत्त्व सोडल कुणी, असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी राज ठाकरे आणि भारतीय जनता पार्टीला केला आहे.
त्यामुळे मंदिरातील आरती अन् कीर्तनावरही रोख - आपला देश हा सर्व धर्मांना घेऊन चालणार देश आहे. ज्यांच्याकडे परवानगी नाही त्यांना भोंगे काढावेच लागणार आहेत. पण, हे तुम्ही तुमचे राजकारण करत असताना मंदिरात सकाळी ज्या आरत्या व्हायच्या किंवा रात्री जे भजन, कीर्तन होत असत त्यावरपण रोख आली आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे संयमी नेतृत्व - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) हे महाराष्ट्राचे संयमी नेतृत्व असून त्यांच्या सोबत संपूर्ण महाराष्ट्राचे लोक आहेत. त्यांनी कधीच भडकावू भाषण केलेले नाही. ते नेहमी संयमी भूमिका घेत असतात, अशी प्रतिक्रिया पेडणेकर यांनी दिली. त्यासोबतच वारसा हक्क मुलालाच मिळतो. वडिलांनी केलेल्या चांगली, वाईट कामे मुलालाच मिळतात ना, अशा शब्दात पेडणेकर यांनी नाव न घेता राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
हेही वाचा - Raj Thackeray Video : राज ठाकरे यांनी घेतले संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळाचे दर्शन