पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (शनिवारी-28) पुणे दौऱ्यावर येत आहेत. कोरोना लस निर्मितीचा आढावा घेण्यासाठी ते पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याबद्दल बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या कामाचे कौतुक करण्यासाठी पुण्यात येत आहेत' अशी टिप्पणी केली होती. त्यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, आमदार चंद्रकांत पाटील यांनी ' सुप्रिया सुळे स्वप्नात आहेत का?' असा उपरोधिक टोला त्यांना लगावला आहे.
महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील भिडे वाडा या ठिकाणी जाऊन महात्मा फुले यांना आदरांजली वाहिली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर उपहासात्मक टीका केली.
महात्मा फुलेंना हीच खरी आदरांजली ठरेल -चंद्रकांत पाटील म्हणाले, या वर्षभरात शेतकरी प्रचंड संकटात आहे. अतिवृष्टी झाल्यानंतरही शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली नाही. नियमितपणे कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळाले नाही. शेतकऱ्यांसाठी लढे लढणे, त्यांच्या मालाला भाव मिळवून देणे यासाठी महात्मा फुले आयुष्यभर संघर्ष करत राहिले. कारण शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होणार नाही, अशी त्यांची धारणा होती. महिला शिक्षणाच्या बाबतीत आजही अनास्था दिसून येते. महिलांना आजही शिक्षण घेता येत नाही. घरातील वेगवेगळ्या कारणामुळे त्यांच्या शिक्षणाला ब्रेक मिळतो. महिलांवरील अन्याय अत्याचारात देखील भयानक वाढ झाली आहे. अन्याय अत्याचाराच्या भीतीमुळे शाळा महाविद्यालय सोडण्याचं प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे शेतकरीं आणि महिला समोरील अडचणी दूर झाल्या तर महात्मा फुलेंना हीच खरी आदरांजली ठरेल. महात्मा फुलेंना भारतरत्न मिळालाच पाहिजे शेती, शिक्षण यासाठी संघर्ष करणारे समाजसुधारक महात्मा फुले यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा, ही मागणी भारतीय जनता पक्षाने फार पूर्वी केलेली आहे. त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळावा यासाठी आम्ही वारंवार मागणी करतोय आणि केंद्र सरकारकडे याचा पाठपुरावाही सुरू आहे. महाविकासआघाडीचे सरकार गोंधळलेले-
हे सरकार सर्वच स्तरावर अपयशी ठरले आहे. तसेच गोंधळलेले आणि समूह भावना नसलेले हे सरकार आहे. सरकारमधील प्रत्येकजण आपापला वेगळा निर्णय घेतो. त्यानंतर मग सरकारमधील दुसरा घटक पक्ष ते होणार नाही म्हणून सांगतो. या सर्वांमध्ये सर्वसामान्य माणसांची मात्र परवड होत असल्याची टीकाही पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.