गोवा - राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Goa Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर तृणमुल काँग्रेस (Trinamool, Congress) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी नुकतीच मुंबईत यावर सकारात्मक चर्चा केल्याचे तृणमुल काँग्रेसचे उपाध्यक्ष लुझिनो फलेरो (Luizinho Faleiro) यांनी सांगितले.
- शरद पवार-ममता बॅनर्जी यांची मुंबईत भेट -
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी सर्वच विरोधक तयार आहेत. मात्र, देशात किंवा राज्यात हे विरोधक एकत्र येण्यास तयार नसल्याचे चित्र दिसून येते. देशात व राज्यातही काँग्रेस भाजपला सक्षम विरोधी पक्ष नसल्याचे तृणमुल व राष्ट्रवादी काँग्रेसकडून बोलले जाते, म्हणूनच देशात भाजपला सक्षम विरोधी पक्ष तयार करण्यासाठी ममता बॅनर्जी व शरद पवार पुढे सरसावले आहेत. नुकतीच ममता बॅनर्जी यांनी शरद पवार यांची मुंबईत भेट घेऊन याविषयी चर्चाही केली असल्याची माहिती मिळत आहे.
- भाजपविरोधात तीन काँग्रेस एकत्र?
राज्यातही भाजपला सक्षम विरोधक तयार होण्यासाठी तृणमुल काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. देशात भाजपला पर्याय म्हणून चारही काँग्रेस पैकी वायएसआर काँग्रेस, तृणमुल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यायला तयार आहेत. हाच प्रयोग गोव्यातील विधानसभा निवडणुकांसाठी केला जाऊ शकतो. आगामी विधानसभा निवडणुकीत तृणमुल आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन भाजपविरोधात निवडणूक लढवू शकतात, तशा प्रकारच्या सकारात्मक चर्चा दोन्ही पक्षात चालू असल्याचे तृणमूलच्या राज्यातील नेत्यांनी सांगितले.