नाशिक - मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक ते मुंबई रस्त्याची पावसामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने अक्षरशः चाळण झाली आहे. 200 किलोमीटर प्रवासासाठी नागरिकांना 5 ते 6 तासांचा वेळ लागत आहे. मात्र दुसरीकडे टोल वसुली जोरात सुरू आहे (toll collection on Nashik Mumbai highway). वाहनधारक संताप व्यक्त करत आहेत.
महामार्गाची अक्षरशः चाळण - संततधार पावसामुळे मुंबई-आग्रा महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे (Road condition dire but toll collection on). त्यामुळे नाशिक-मुंबई हा प्रवास अत्यंत खडतर आणि धोकादायक झाला आहे. नाशिकहून दररोज मुंबईकडे खासगी वाहनाने हजारो वाहने जात असतात. तसेच बसनेही नागरिक मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात. मात्र, मागील दोन महिन्यांपासून पावसामुळे या महामार्गाची अक्षरशः चाळणी झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही मार्गावर खड्डे पडलेत. वाहन धारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे 200 किलोमीटरच्या प्रवासाला 5 ते 6 तासांचा कालावधी लागत आहे. मात्र असं असलं तरी टोल वसुली धडाक्यात सुरू आहे. चारचाकीसाठी एकबाजूच्या प्रवासाला 135 रूपये टोल द्यावा लागत आहे. पैसे देऊनसुद्धा सुविधा मिळत नसल्याने वाहनधारकाने नाराजी व्यक्त केली.
पालकमंत्री नाही - आताही नाशिकला पालकमंत्री नसून या महामार्गाबाबत शासनस्तवरून काहीही हालचाल दिसत नाहीत. त्यामुळे माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाच्या (NHAI) प्रकल्प संचालकांसोबत नाशिक येथील कार्यालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी नॅशनल हायवे ॲथोरिटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. मुंबई-आग्रा महामार्गाची दुरवस्था नजरेस आणून देत, रस्त्याची दुरुस्ती तातडीने करावी, अशा सूचना केल्या. यावेळी आठ दिवसांच्या आत नाशिक ते मुंबई दरम्यान महामार्गावरील सर्व खड्डे पूर्णपणे बुजवले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी भुजबळ यांना दिली.
या ठिकाणी खड्डे - नाशिकहून मुंबईकडे जाताना विल्होळी, इगतपुरी, कसारा, घोटी, पडघे फाटा व टिटवाळा या भागातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तसेच काही ठिकाणी उड्डाण पुलांची कामे सुरू आहे. त्यासाठी बनवण्यात आलेले सर्व्हिस रोड निकृष्ट कामांमुळे पावसाने अधिक खराब झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहने खड्ड्यात जाऊन टायर कापले जातात. त्यामुळे वाहनधारकांचे मोठे नुकसान होते. काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय रस्ते प्राधिकरणने खड्यात तात्पुरता मुरूम व पेव्हरब्लॉक टाकून खड्डे बुजवले. मात्र आठच दिवसात खड्डे उघडे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहन चालवणे कठीण बनलं आहे.