नाशिक - सार्वजनिक आरोग्य विभागाच्या परीक्षेची तारीख अखेर ठरली असून २४ ऑक्टोंबर रोजी ही परीक्षा होणार आहे. राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गांसाठी भरती होत आहे. २ हजार ७३९ रिक्त पद या भरती परीक्षेनंतर भरली जाणार आहेत. न्यास एजन्सी मार्फत ही परिक्षा घेण्यात येणार आहे.
एकूण ४ लाख ५ हजार १५६ अर्ज प्राप्त झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागात १०० टक्के रिक्त पदे भरण्याची परवानगी दिली आहे. न्यास एजन्सी मार्फत ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
शंकांचे संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी नाशिक येथे केले निरसन
सार्वजनिक आरोग्य विभागातील आयुक्तालय आरोग्य सेवा अंतर्गत गट ‘क’ व ‘ड’ पदभरती संदर्भात येत असलेल्या विविध शंका व उलट - सुलट बातम्यांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषद घेवून खालील प्रमाणे वस्तुस्थिती माध्यमांसमोर मांडली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने आरोग्य विभागास १०० % रिक्त पदे भरण्यासाठी परवानगी दिली आहे. त्यास अनुसरून आरोग्य विभागाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी मे. न्यास कम्युनिकेशन यांची नेमणूक केली आहे. शासनाच्या परवानगीनुसार गट. क मधील ५२ संवर्गातील २७३९ रिक्त पदे भरण्यासाठी ५ ऑगस्ट २०२१ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्यास अनुसुरून ४ लाख ०५ हजार १६३ अर्ज प्राप्त झाले. याबाबतची परीक्षा मे. न्यास यांच्यामार्फत दि २४ ऑक्टोबर २०२१ रोजी घेण्यात येणार आहे. सदरील भरती परीक्षा राज्य स्तरावरील २४ आणि मंडळ स्तरावरील २८ अशा एकूण ५२ संवर्गांसाठी घेण्यात येत आहे. राज्य स्तरावरील संवर्गाचे नेमणूक अधिकारी हे संबंधित सहसंचालक असून मंडळ स्तरावरील पदांचे नेमणूक अधिकारी ८ उप संचालक मंडळे आहेत. उपरोक्त परीक्षार्थींना प्रवेश पत्र निर्गमित करण्याची कार्यवाही दि १५ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपासून सुरू झाली असून आज सकाळी १० वाजेपर्यंत २ लाख ४१ हजार ५९० उमेदवारांनी प्रवेशपत्र डाउनलोड केले आहे. यापैकी २ हजार ८६९ उमेदवारांनी परीक्षेबाबत तक्रारी केल्या आहेत. उमेदवारांच्या तक्रारी प्रामुख्याने खालील स्वरुपाच्या आहेत.
हेही वाचा - VIDEO : इगतपुरीच्या नागरी वस्तीत बिबट्याचा मुक्त संचार
उमेदवारास परीक्षा केंद्र देताना प्रत्येक अर्जाचा स्वतंत्रपणे विचार करण्यात आला असून उमेदवाराचे पद ज्या नेमणूक अधिकाऱ्याच्या अंतर्गत येते त्या विभागात त्यास परीक्षा केंद्र दिले आहे. उदा. उमेदवाराने अकोला विभागातील पदासाठी अर्ज केला असल्यास त्यास अकोला विभागातीलच परीक्षा केंद्र मिळेल. म्हणजेच उमेदवार ज्या विभागात नोकरी करू इच्छितो त्या विभागात त्याने परीक्षा देणे अपेक्षित आहे. ही अट ठेवली नाही तर, कोणत्याही भागातील उमेदवार आपल्या गावी बसून राज्यातील इतर कोणत्याही भागासाठी अर्ज करतील आणि निवड झाल्यावर एक तर हजर होणार नाहीत किंवा हजर होऊन काम करणार नाहीत किंवा पहिल्या दिवसापासून बदली मागतील. याचा सर्वात जास्त दुष्परिणाम आदिवासी भागावर होईल.
२४ ऑक्टोबर २०२१ रोजी होणारी परीक्षा १४ नेमणूक अधिकाऱ्यांच्या / कार्यालयांच्या अधिनस्त ५२ संवर्गांसाठी घेण्यात येत आहे. उमेदवारांनी एकाच पदासाठी वेगवेगळ्या नेमणूक अधिकाऱ्यांकडे/ कार्यालांकडे अर्ज केले आहेत. उदा. एका उमेदवाराने वाहन चालक पदासाठी उपसंचालक पुणे, नाशिक, अकोला येथे आणि सहसंचालक पुणे येथे अर्ज केले आहेत. या उमेदवारास सर्व परीक्षा देण्याची सोय करावयाची झाल्यास वाहन चालकाच्या प्रत्येक मंडळ व सहसंचालक कार्यालयाच्या परीक्षा वेगवेगळ्या १४ रविवारी घ्याव्या लागतील. हीच बाब ५२ संवर्ग आणि १४ नेमणूक अधिकारी/कार्यालयांच्या बाबत ठरवावयाची झाल्यास या परीक्षा दीड ते दोन वर्ष चालतील. त्यामुळे ५२ संवर्गांच्या परीक्षा २ शिफ्टमध्ये घेण्यात येत आहेत, तसा उल्लेखसुद्धा जाहिरातीमध्ये अर्ज भरण्याच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये तसेच वारंवार notification मध्ये केलेला आहे. उमेदवारांना सोयीचे व्हावे यासाठी यातील पहिल्या शिफ्टमध्ये १० ते १२ वी शिक्षण आवश्यक असणारे व दुसऱ्या शिफ्टमध्ये पदवी व त्यावरील शिक्षण आवश्यक असणारे संवर्ग सामाविष्ट केले आहेत.
हेही वाचा - नाशकात विष घेऊन तरुणाची आत्महत्या