नागपूर - एकीकडे ग्रामीण आणि दुर्गम भागातील गरीब विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके मिळत नसल्याची परिस्थिती आहे, तर दुसरीकडे महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक भांडार आणि निर्मिती केंद्र (बालभारती) ने दहा वर्षांच्या कालावधीत तब्बल ५ हजार ६३३ मॅट्रिक टन पुस्तके रद्दीत फेकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पुस्तकांची किंमत सहा कोटी ४० लाख रुपये इतकी आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलरकर यांनी या विषयाच्या अनुषंगाने अनेक प्रश्न विचारले होते. त्यापैकी एकाच प्रश्नांचे उत्तर बालभारतीकडून देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य पाठ्य पुस्तक भांडार आणि निर्मिती केंद्राकडून दरवर्षी कोट्यवधी रुपयांची पुस्तकं छापली जातात. मात्र, तरी देखील ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांपर्यत ते पुस्तके पोहचत नाहीत. नियोजन शून्य कारभारामुळे हजारो-कोटींचे पुस्तके गोडाऊनमध्ये सडवली जातात. मात्र, त्याचे वितरण करताना काय अडचणी येतात या संदर्भात मात्र बालभारतीकडून खुलासा करणे आवश्यक आहे.
हेही वाचा - आठवीच्या पुस्तकात सुखदेव यांच्याजागी कुर्बान हुसैन फासावर; संबंधितांवर कारवाईची मागणी
- माहितीच्या अधिकारातून झालेला खुलासा:-
२०१२ पासून बालभारतीने पाच हजार ६३३ मॅट्रिक टन पुस्तके खराब झाल्याने रद्दीत विकली आहेत. यामध्ये २०१२ पासून तब्बल चारवेळा पुस्तके रद्दीत विकण्याची प्रक्रिया करण्यात आली. २०१२, २०१६, २०१७ त्यानंतर २०१८ मध्ये पुस्तकांची रद्दीत विक्री करण्यात आली आहे. सर्वाधिक पुस्तकं २०१६ साली विकण्यात आली आहेत. या प्रक्रियेतून बालभारतीला सहा कोटी ४० लाख रुपये जरूर प्राप्त झाले. मात्र, रद्दीत विकलेल्या पुस्तकांची मूळ किंमत किती कोटी रुपये होती या संदर्भात बालभारतीकडून खुलासा करण्यात आलेला नाही.
हेही वाचा - 'हुतात्मा कुर्बान हुसेन स्वातंत्र्य लढ्यातील खरे हिरो, बालभारतीत नव्याने नाव समाविष्ट करा'